हैदराबाद - तेलंगणामधील सिंगमपेटा हे दुर्गम गाव आता चर्चेत आले आहे. एखाद्या चांगल्या गोष्टीसाठी नाही, तर या गावातील खऱ्याखुऱ्या 'ड्रॅक्युला'मुळे हे गाव सर्वांच्या चर्चेचा विषय ठरत आहे. या गावातील एक व्यक्ती प्रत्येक पौर्णिमेला जनावरांचे रक्त पितो, अशी माहिती पसरल्यानंतर गावामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
राजू असे नाव असलेल्या या व्यक्तीने, गेल्या चार ते पाच वर्षांमध्ये तब्बल ५० जनावरांना मारून त्यांचे रक्त पिले आहे. यामध्ये विशेषतः शेळ्या आणि मेंढ्यांचा समावेश आहे. त्याची ही 'भूक' वाढून पुढे गावातील लहान मुलांनादेखील त्याच्यामुळे धोका निर्माण होऊ शकतो, म्हणून गावातील लोकांमध्ये भीती पसरली आहे.
याबाबत बोलताना राजू म्हणतो, की त्याच्यावर कोणीतरी जादूटोणा केल्यामुळे तो असे करत आहे. ज्यात अर्थातच तथ्य नाही. मात्र, राजूला याबाबत कोणतीही माहिती नाही की, त्याला ही चटक कशी लागली. आता याची सवय झाल्याचे तो सांगतो.
हेही वाचा : चीनसोबतची चर्चा वादविवाद जिंकण्यासाठी नाही, तर ठोस परिणामांसाठी...
राजूच्या या विकृत सवयीमुळे त्याचे कुटुंबीय त्रस्त झाले आहेत. प्रत्येक वेळी राजूने एखादे जनावर मारले, की त्याचे पैसे त्याच्या कुटुंबीयांना चुकते करावे लागतात. शिवाय, गावातील लोक या कुटुंबाकडे संशयास्पद नजरेने पाहतात ते वेगळेच. त्यामुळे आता सरकारने याबाबत आपली काही मदत करावी अशी, हे कुटुंबीय मागणी करत आहेत.
राजूच्या कुटुंबीयांच्या मते, राजू मानसिक रोगी आहे. मात्र, त्याचा इलाज करण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नसल्याने, सरकारने त्यांची काही मदत करावी, अशी त्यांची मागणी आहे. त्यांना अशी आशा आहे, की उपचार झाल्यानंतर त्यांचा मुलगा नक्कीच पूर्वीसारखा ठीक होईल.
हेही वाचा : मेक्सिकोत सुरक्षा दल- शस्त्रधारी टोळक्यामधे गोळीबार, एका जवानांसह १५ जणांचा मृत्यू