नवी दिल्ली- देशात पहिला कोरोना रुग्ण हा ३० जानेवारीला केरळमध्ये सापडला होता. त्यानंतर कोरोना संसर्ग गतिमान झाला व संपूर्ण भारत भर पसरला. आधीच भारतात ६२ लाखांच्यावर कोरोना रुग्ण आहेत. त्यात आता हिवाळ्यात कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. त्यामुळे, आता हिवाळ्यातही कोरोनाचा कहर काही कमी होणार नसल्याने नागरिकांनी खबरदारी घेण्याची गरज आहे.
सार्स, इन्फ्लूएन्झा सारखे श्वसन संबंधी आजार यांच्या संसर्गावर ऋतूंचा प्रभाव असतो. हे आजार असणाऱ्या रुग्णांची संख्या हिवाळ्यात जास्त असते. कारण व्हायरसमध्ये हिवाळ्यात टिकून राहण्याची क्षमता जास्त असते. तसेच, वातावरणातील दमटपणा हा विषाणू कणांच्या बाष्पीभवनाला पुरक असतो. तसेच, हे वातवरण एरोसोल निर्मितीलाही पुरक असते. त्यामुळे, हवेच्या माध्यमातून आजार पसरण्यास मदत होते, अशी माहिती नवी दिल्लीतील फोर्टीस रुग्णालयातील डॉ. रिचा सरीन यांनी दिली.
त्याचबरोबर, हिवाळ्यात व्हिटॅमीन डी ची कमतरता भासते. त्यामुळे, शरीरातील रोग प्रतिकारकशक्ती कमी होते. यामुळे कोविड किंवा इतर आजार होऊ शकतात. मात्र, हिवाळ्यामुळे कोविड संसर्गावर काही परिणाम झाल्याचे अद्याप दिसून आलेले नाही. तरीही नागरिकांनी कोविड पासून संरक्षण करण्यासाठी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे व हात सॅनिटायझरने स्वच्छ धुवावे, असे आवाहन डॉ. रिचा सरीन यांनी केले.
दरम्यान, काल (३० सप्टेंबर) सरो सर्व्हेचा दुसरा अहवाल समोर आला होता. त्यात ऑगस्ट महिन्याच्या आखेरीस देशात ८ कोटी ७० लाख कोरोना रुग्ण असल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच, १५ नागरिकांमधील एका नागरिकाला कोरोनाची लागण झाल्याचे आयसीएमआरचे (इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च) महासंचालक बलराम भार्गव यांनी सांगितले आहे.
हेही वाचा- हे योगी सरकार, कधीही बाजू पलटू शकते - भाजपा नेते कैलास विजयवर्गीय