पाटना - मुळचा बिहारमधील युवकाचा महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यात मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. हा तरुण कोरोनाचा संभाव्य रुग्ण होता. उपचारादरम्यान त्याचे निधन झाले. मात्र, त्याच्या कुटुंबीयांनी कोरोना झाल्याची शक्यता फेटाळत मुलाची हत्या झाल्याचा आरोप केला आहे. तसेच याला जबाबदार असलेल्या महाराष्ट्रातील अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
गणेश यादव हा युवक मुळचा बिहामधील पाटना जिल्ह्यातील मनेर येथील रतनटोला गावचा रहिवासी आहे. सहा महिन्यांपूर्वी तो बिहारवरून धुळ्यातील एका दुध डेअरीमध्ये कामासाठी आला होता. तेथे गायींची काळजी घेण्याचे काम त्याच्याकडे होते. मात्र, २९ एप्रिलला त्याची अचानक तब्येत बिघडल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यातच त्याचा मृत्यू झाला. त्याला कोरोना असल्याचा संशय असल्याने मृतदेह कुटुंबीयांच्या हाती न सोपवता महाराष्ट्रातच अंत्यसंस्कार करण्यात आले.

मुलाची हत्या केल्याचा कुटुंबीयांचा आरोप

गणेशला कोरोनाची लागण झाली नसुन त्याची हत्या करण्यात आल्याचा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केला आहे. फक्त कोरोनाचे नाव देण्यात आल्याचे त्यांचे म्हणणे आहे. गणेश ज्या डेअरीत काम करत होता तेथील मॅनेजरबरोबर कामगारांचा वाद सुरु होता. त्यामुळे कुटुंबीयांचा डेअरीवर संशय आहे.

२९ एप्रिलपर्यंत गणेशबरोबर फोनवर बोलणे झाले तेव्हा तो ठीक होता. तर अचानक मृत्यू कसा झाला? असा प्रश्न कुटुंबीयांनी महाराष्ट्रातील प्रशासनाला केला आहे. तसेच अंत्यसंस्कारापूर्वी आम्हाला काहीही माहिती देण्यात आली नाही. असे गणेशचे वडील देव सहाय यादव यांचे म्हणणे आहे. न्याय मिळवून देण्याची मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली आहे.