नवी दिल्ली - कोरोना विषाणूविरूद्ध लढ्यात युद्धपातळीवर हातभार लावण्यासाठी शुक्रवारी काँग्रेसने कोरोनाविरोधी रणनीती आखली. काँग्रेस कार्यकारणी समितीच्या नेत्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली. संकटाला तोंड देण्यासाठी सर्व राज्यांतील काँग्रेसच्या संघटना आणि कार्यकर्ते कोरोनाविरोधात लढा देतील. तसेच समितीकडून केंद्र सरकाराला काही उपाय सुचवण्यात आले आहे. यावेळी सोनिया गांधी यांनी अर्थव्यवस्थेबाबत चिंता व्यक्ते केली.
जगातील बर्याच देशांच्या तुलनेत भारतात कोरोना विषाणूची चाचणी घेण्याचे प्रमाण फार कमी आहे. तपासणीची संख्या वाढवण्याची गरज आहे. प्रत्येक नागरिकाला तपासणीची सुविधा जलद मिळू शकेल, अशी विश्वासार्ह यंत्रणा सुनिश्चित करावी लागेल. आरोग्य कर्मचार्यांना आवश्यक उपकरणे उपलब्ध करून देण्यात यायला हवीत आणि त्यांनाही योग्य आर्थिक सुरक्षा मिळायला हवी, असे सोनिया गांधी यांनी म्हटले.
लॉकडाऊनमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर मोठा ताण येणार आहे. अर्थव्यवस्था आधीच डगमगली होती आणि आता कोरोनामुळे अधिक अडचणी वाढतील. या परिस्थितीसाठी आपण तयार असले पाहिजे. दु:खामध्ये जनतेचे समर्थन करावे लागेल आणि त्यांचे त्रास दूर करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावे लागतील. तसेच लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्थेवर भार पडणार आहे. यासाठी सरकारची योजना असेल याची आशा आहे, असे सोनिया गांधी म्हणाल्या.
काँग्रेस कार्यकारणी समितीकडून केंद्र सरकारला काही उपाय सुचवण्यात आले आहेत. त्यामध्ये प्रत्येक जनधन खात्यात 7 हजार 500 रुपये टाकण्यात यावेत. गरीब कुटुंबातील प्रत्येक सदस्याला 10 किलो मोफत रेशन द्यावे आणि सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना विशेष संरक्षण दिले जावे. तसेच शेतकरी व मजुरांना विशेष सहाय्य द्यावे, या सूचना दिल्या आहेत.