बिकानेर - सौरुणा पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या भीषण अपघातात लष्कराच्या अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. अपघाताची भीषणता इतकी होती, की चारचाकीचा चुराडा झाला आहे. तर, अन्य दोन लष्करी अधिकारी अत्यवस्थ आहेत. या दोघांवर पीबीएम रुग्णालयातील ट्रॉमा सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत.
सौरुणा पोलीस ठाण्याच्या हद्दीत जोधसर गावाजवळ या गाडीचे नियंत्रण सुटल्याने चारचाकी उलटली. महामार्गावर वेग जास्त असल्याने मोठा अपघात ओढावला. या सफारी चारचाकीतील कर्नल मनीष सिंह चौहान आणि मेजर नीरज शर्मा यांचा मृत्यू झालाय. त्यांचे सहकारी या अपघातात जखमी झाले आहेत. जखमींना स्थानिकांच्या मदतीने पीबीएम रुग्णालयात भरती करण्यात आले.
संबंधित घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला. यानंतर लष्कराच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्यात आला. घटनास्थळी लष्कराचे अधिकारी पोहोचल्यानंतर त्यांना सर्व घटनाक्रम सांगण्यात आला. तसेच पोलिसांनी अन्य सविस्तर माहिती पुरवली.
चारचाकीचा अपघात होण्यामागे भरधाव गाडीसमोर एखादे जनावर आल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.