भारताकडून निमंत्रण प्राप्त झाल्यावर, ब्राझीलचे अध्यक्ष जेर बोल्सेनारो हे कालच्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिले होते. अधिकारी आणि ५९ उद्योजकांचा समावेश असलेल्या मोठ्या शिष्टमंडळाचे नेतृत्व त्यांनी केले. भारतभेटीवर आलेल्या पाहुण्यांनी भारतीय नेतृत्वाबरोबर एकास एक अशी आणि नंतर शिष्टमंडळ स्तरावरील बोलणी २५ जानेवारीला केली. मात्र, बोल्सेनारो यांची प्रमुख पाहुणे म्हणून निवड करण्याबाबत काहींच्या भुवया निश्चितच उंचावल्या. कारण बोल्सेनारो हे त्यांच्या अति उजव्या विचारसरणीबद्दल ओळखले जातात, आणि त्यांना स्त्रीद्वेष्टा आणि समलैंगिकांबद्दल भीती बाळगणारे असेही म्हणण्यात येते.
माजी लष्करी अधिकारी असलेले बोल्सेनारो हे २०१८ पर्यंत ब्राझीलच्या राजकारणात फारसे महत्वाचे नव्हते. ते हाऊस ऑफ डेप्युटीजमध्ये सलग ७ वेळा निवडून आले होते. तरीसुद्धा, वजनदार स्पर्धक आणि माजी अध्यक्ष लुला हे अपात्र ठरल्यावर, बोल्सेनारो यांना सर्वोच्च पदापर्यत पोहचणे सहज शक्य झाले. बोल्सेनारो यांचे विचार कितीही वादग्रस्त असले तरीही, त्यांना उभरती अर्थव्यवस्था असलेल्या एका लोकशाही देशाचे कायदेशीर निवडलेले अध्यक्ष म्हणून निमंत्रित करण्यात आले होते.
अनेक मोठ्या आणि मैत्रीपूर्ण देशांमध्ये ब्राझीललाच का निमंत्रण दिले, असा प्रश्न एखाद्याला पडू शकतो. याची कारणे शोधणे अवघड नाही. राजकीयदृष्ट्या, ब्राझील हा भारताबरोबर अशा प्रकारे करारावर २००६ मध्ये स्वाक्षरी केलेल्या काही थोड्या डावपेचात्मक भागीदारांपैकी एक आहे. तो ब्रिक्स (ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका), आयबीएसए (भारत, ब्राझील आणि दक्षिण आफ्रिका) आणि जी-२० गटांचा सदस्य आहे. जी-४ गटाचा सदस्य म्हणून (ब्राझील, जर्मनी, भारत आणि जपान), ब्राझील आणि भारत यांनी संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेचा विस्तार झाल्यावर एकमेकांच्या कायमस्वरूपी सदस्यत्वास पाठिंबा दिला आहे. संयुक्त राष्ट्रसंघात, दहशतवाद, एसडीजी आणि शांतता पुढाकार या मुद्यांवर ब्राझीलने भारताला नेहमीच पाठिंबा दिला आहे.
व्यापारी बाजूने पहायचे तर, ब्राझीलला मंदीचा तडाखा बसल्यावर दोन्ही उभरत्या अर्थव्यवस्थांनी २०१० मध्ये जवळजवळ एकाच जीडीपी दराने वाटचाल केली. अलिकडे भारतीय अर्थव्यवस्थेनेही मंदीची लक्षणे दाखवण्यास सुरूवात केली आहे. तरीसुद्धा, जगातील सर्वात मोठे लोखंडाचे साठे आणि संकरित उर्जेसाठी इथेनॉलचा सर्वात मोठा स्त्रोत असल्याने ब्राझिल आमच्यासाठी महत्वाचा आहेच. खनिजतेलाच्या बाबतीतही, ब्राझीलकडे सुमारे ८२ अब्ज बॅरल खनिजतेलाचा साठा आहे. आखातातील सध्याच्या अनिश्चित परिस्थितीत, ब्राझील आमच्यासाठी पारंपरिक उर्जेचा स्त्रोत होऊ शकतो. या क्षेत्रावर आम्ही सहकार्याचा करार अगोदरच आम्ही केला आहे. ब्राझील हा फक्त २० टक्के शेतीयोग्य भूभाग वापरत असूनही (जो भारतापेक्षा २.७ पटींनी जास्त आहे) साखर, कॉफी, सोयाबीन यांचा सर्वाधिक मोठा उत्पादक देश आहे. जगातील वनक्षेत्रापैकी २० टक्क्याहून अधिक (अमेझॉन पर्जन्यवन) वनक्षेत्र एकट्या ब्राझीलमध्ये आहे. तसेच जैववैविध्य आणि औषधी वनस्पतींनी तो समृद्ध आहे. उत्पादन क्षेत्रात ब्राझीलने जी मोठी झेप घेतली आहे, ती आमच्यासाठी धडा ठरून संभाव्य सहकार्य अस्तित्वात येऊ शकते. १८९६ मध्ये भारतातील गिर भागातून ७०० गायींची निर्यात करण्यात आली. आज ब्राझील सर्वात मोठा मांसाचा निर्यात करणारा आणि दुग्धजन्य पदार्थांचा प्रमुख उत्पादक आहे, हे नमूद केले पाहिजे. तसेच तो गुरांच्या अनुवंशिकरित्या सुधारित प्रजाती विकसित करत आहे. आम्ही एमईआरसीओएसयूआरसोबत मुक्त व्यापार करार केला असून त्याचा ब्राझील हा एक सर्वात महत्वाचा सदस्य आहे.
सामाजिकदृष्ट्या, ब्राझीलचा गरिब लोकसंख्येच्या उत्थानासाठी आखलेला कार्यक्रम प्रशंसनीय आहे. बोलसा फॅमिली (फॅमिली पॅकेज) हा त्याचा कार्यक्रम, डेटावर नियमित देखरेख करण्यावर आधारित आहे. दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांतील महिलेच्या नावावर (पुरुषांच्या नव्हे) मासिक अर्थसहाय्य थेट खात्यात जमा केले जाते. मात्र संबंधित परिवाराने आपण नियमितपणे आरोग्य तपासणी करून घेतो आणि मुले शाळेत नियमितपणे जातात, हे सिद्ध करायचे असते. भारताने नुकतीच याची अंमलबजावणी अंशतः स्वरूपात केली आहे. अशा तऱ्हेने, ब्राझील परस्परविकासाची खात्री करण्यासाठी आमच्यासाठी महत्वाचा देश ठरतो. सध्याच्या भेटीदरम्यान, दोन्ही देशांनी तब्बल १५ सामंजस्य आणि इतर करारांवर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. उद्योग, हवाई वाहतूक, आरोग्य, पारंपरिक औषधे, कृषी, उर्जा, खाणी, नाविन्यपूर्ण संशोधन, पशुसंवर्धनपासून ते संरक्षण उत्पादन आदी क्षेत्रात करार केले आहेत. जेव्हा ते अंमलात येतील, तेव्हा ते नक्कीच आपल्या अर्थव्यवस्थेला नवीन चालना देतील.
हेही वाचा : कोरोनाचा कहर : मृतांची संख्या ८० वर; तर २३०० हून अधिक नागरिकांना संसर्ग..