हैदराबाद Airtel AI powered spam detection :भारतातील दुसरी सर्वात मोठी दूरसंचार कंपनी Bharti Airtel नं देशातील पहिलं AI शक्तीवर चालणारं Spam Detection लॉन्च केलंय. यामुळं कंपनीच्या ग्राहकांना स्पॅम कॉल तसंच मेसेज येण्याचं प्रमाण कमी होईल, असं कंपनीनं म्हटलंय.
Airtel Spam Detection :Bharti Airtel टेलिकॉम कंपनीनं लॉन्च केलेलं Spam Detection देशात पहिलं आहे. Spam Detection ग्राहकांना संशयास्पद स्पॅम कॉल्स आणि एसएमएसबद्दल रिअल-टाइममध्ये अलर्ट करेल. एअरटेलचे हे नवीन एआय सोल्यूशन कंपनीच्या ग्राहकांसाठी आपोआप सक्रिय होईल. यासाठी कोणतंही ॲप डाउनलोड करण्याची आवश्यकता नसल्याचं कंपनीचं म्हणणं आहे.
दुहेरी स्तर सुरक्षा उपाय :भारती एअरटेलचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी गोपाल विठ्ठल म्हणाले, “स्पॅम ग्राहकांसाठी मोठी समस्या बनली आहे. या समस्येचं निराकरण करण्यासाठी आम्ही गेल्या 12 महिन्यांत खूप काम केलं आहे. "आज उचललं जाणारं हे पाऊल एक मैलाचा दगड ठरेल. कारण आम्ही देशातील पहिलं एआय-सक्षम स्पॅम-मुक्त नेटवर्क लॉन्च करत आहोत."
सोल्यूशनमध्ये फिल्टरचं दोन स्तर :“दुहेरी स्तर सुरक्षा म्हणून डिझाइन केलेल्या सोल्यूशनमध्ये फिल्टरचं दोन स्तर आहेत. पहिलं नेटवर्क स्तरावर आणि दुसरे आयटी सिस्टम स्तरावर. प्रत्येक कॉल आणि एसएमएस या डबल लेयर AI शील्डमधून जाईल. दररोज 150 कोटी संदेश आणि 250 कोटी कॉल्सवर दोन मिलिसेकंदांमध्ये AI प्रक्रिया करणार आहे. AI च्या सामर्थ्याचा वापर करून रिअल-टाइम आधारावर 10 ट्रिलियन रेकॉर्डवर प्रक्रिया करण्यासारखे आहे. 10 कोटी संभाव्य स्पॅम कॉल आणि दररोज प्राप्त होणारे 30 लाख स्पॅम एसएमएस यशस्वीरित्या ओळखण्यात AI सक्षम आहे. आमच्यासाठी, आमच्या ग्राहकांना सुरक्षित ठेवणे हीच आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे”, असं गोपाल विठ्ठल म्हणाले.
एअरटेलनंच केलं डिझाइन :AI एअरटेलनं स्वत: इन-हाउस डिझाइन आणि विकसित केलं आहे. येणारे कॉल आणि एसएमएस 'संशयास्पद स्पॅम' म्हणून ओळखण्यासाठी कंपनीच्या अल्गोरिदमचा वापर केला आहे. हा अल्गोरिदम पॅटर्न, वारंवारता, कालावधी आणि इतर अनेक पॅरामीटर्सनुसार कॉल आणि एसएमएसचं विश्लेषण करू शकतो. कोणताही स्पॅम एसएमएस आल्यावर AI ग्राहकाला सतर्क करणार आहे.