महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

लातूर भूकंपावेळी शरद पवारांनी तत्कालीन पंतप्रधानांना राज्यात येण्यास दिला होता नकार; जाणून घ्या कारण... - SHARAD PAWAR ON LATUR DISASTER

कोल्हापूरातील व्हाईट आर्मीकडून मिळालेला 'आपत्ती काळातील महायोद्धा' पुरस्कार स्वीकारताना शरद पवार यांनी आपत्ती व्यवस्थापनातील आठवण सांगितली.

SHARAD PAWAR
कोल्हापूरातील व्हाईट आर्मीकडून मिळालेला 'आपत्ती काळातील महायोद्धा' पुरस्कार स्वीकारताना शरद पवार (ETV Bharat Reporter)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 23, 2025, 10:10 PM IST

कोल्हापूर : ३० सप्टेंबर १९९३ ची पहाट महाराष्ट्रासाठी काळरात्र ठरली होती. पहाटे लातूर जिल्ह्यातील किल्लारी या ठिकाणी झालेल्या भूकंपानं लातूरसह देशाला मोठा धक्का बसला होता. मुख्यमंत्री म्हणून अवघ्या दोन तासात मी घटनास्थळी पोहोचलो. तोपर्यंत भूकंपाची बातमी वाऱ्यासारखी देशभर पसरली होती. तत्कालीन पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांनी मीही घटनास्थळाची पाहणी करण्यासाठी येत असल्याचा फोन‌ केला. मात्र, मी त्यांना स्पष्ट शब्दात तुम्ही न येण्याची विनंती केली. पंतप्रधान घटनास्थळावर आल्यानंतर मदत कार्याला याचा अडथळा ठरेल. हे त्यांना पटवून दिलं, भारताच्या इतिहासात पंतप्रधानांना आपल्या राज्यात येऊ नका, असं एक मुख्यमंत्री पंतप्रधानांना सांगत होता. अशी आठवण राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी सांगितली. गुजरात, लातूर आणि १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटात आपत्ती काळात केलेल्या कार्याबद्दल कोल्हापुरातील व्हाईट आर्मी संस्थेकडून 'आपत्ती काळातील महायोद्धा पुरस्कारा'नं खासदार शरद पवार यांना सन्मानित करण्यात आलं यावेळी ते बोलत होते.

विरोधक असूनही आपत्ती हाताळण्यासाठी माझ्यावर जबादारी :यावर्षी गुजरात मधल्या भुजला भूकंप झाला. त्यावेळी सर्व पक्षांना एकत्र घेत तत्कालिन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी बैठक घेतली होती. कुठेही संकट आलं. त्यामध्ये महापूर, आपत्ती, काहीही असो त्यासाठी काही यंत्रणा हाताळण्यासाठी आवश्यकता असते. मला लातूरमध्ये झालेल्या भूकंपाची आपत्ती हाताळण्याचा अनुभव असल्याने विरोधी पक्षात असूनही पंतप्रधान वाजपेयी यांनी ही जबाबदारी माझ्यावर दिली होती. ही जबाबदारी यशस्वीपणे पूर्ण करू शकलो याचा आनंद आहे. देशात येणाऱ्या नैसर्गिक आपत्तीवर कायमस्वरूपी उपाय म्हणून राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा करण्यात आला. याचाच मतदारसंघ म्हणून आता देशात येणाऱ्या आपत्तीमध्ये शासकीय यंत्रणा आता उत्कृष्ठ काम करत आहेत. त्यांना पाठबळ देण्याची आवश्यकता असल्याचं यावेळी खासदार शरद पवार म्हणाले.

म्हणून मी त्यावेळी जाणीवपूर्वक खोटं सांगितलं :मी रेडिओवरून खोटं सांगितलं आणि मुंबई २४ तासात शांत झाली. १९९३ मध्ये मुंबई साखळी बॉम्ब स्फोट झाला. ती सर्व ठिकाणी हिंदू रहिवाशी क्षेत्र आहेत. ही माहिती मला समजली होती, यातून मी काय ओळखायचं ते ओळखलं. हिंदू-मुस्लिम तेढ निर्माण करण्याचा हा प्रयत्न होता. हे माझ्या लक्षात आलं म्हणून मी रेडिओ वरून बॉम्ब स्फोट झालेली ९ ठिकाणी खरं सांगितली आणि एक ठिकाण जाणीवपूर्वक खोटं सांगितलं. मुंबईतल्या महंमद अली रोडवर सुद्धा बॉम्ब स्फोट झाल्याचं मी सांगितलं. यातून बॉम्ब स्फोटात फक्त हिंदूच नाही तर, मुस्लिम सुद्धा टार्गेट आहेत, हा संदेश गेला. याचा परिणाम म्हणजे २४ तासात मुंबई शांत झाली, अशी आठवण ही मुख्यमंत्री काळात बजावलेल्या कामगिरी बद्दल शरद पवारांनी सांगितली. या कार्यक्रमाला व्हाईट आर्मीचे संस्थापक अशोक रोकडे, उमेशचंद्र सारंगी, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डी टी शिर्के, प्र. कुलगुरू डॉ. व्ही. एस. पाटील, कुलसचिव डॉ. डॉ व्ही. एन. शिंदे, खासदार शाहू महाराज छत्रपती, जिल्हाधिकारी अमोल येडगे, सरोज पाटील, शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजीत घाटगे, जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील उपस्थित होते.

हेही वाचा :

  1. काका-पुतण्या एकाच मंचावर; एकमेकांच्या शेजारी बसणं टाळलं, कार्यक्रमात काय घडलं? पाहा व्हिडिओ
  2. उद्धव ठाकरेंनी घेतली शरद पवारांची भेट, दोन नेत्यांमध्ये नेमकी चर्चा काय?
  3. “शरद पवारांच्या दगाफटक्याच्या राजकारणाला २० फूट जमिनीत गाडलं", अमित शाहांचा शिर्डीतून एल्गार

ABOUT THE AUTHOR

...view details