महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

लोकसभेत पत्नीच्या पराभवानंतर अजित पवार यांचा सावध पवित्रा; विधानसभा निवडणुकीसाठी आखली 'ही' रणनीती - Ajit Pawar

Ajit Pawar : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी त्यांची पत्नी सुनेत्रा पवार यांना बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीसाठी उभं केलं होतं; परंतु त्यांचा पराभव झाला. या घटनेनंतर अजित पवार अतिशय सतर्क झाले असून विधानसभा निवडणुकीत असा फटका बसू नये यासाठी ते प्रयत्नशील आहेत. वाचा त्यांची संपूर्ण रणनीती...

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 25, 2024, 5:01 PM IST

Ajit Pawar
अजित पवार (Etv Bharat Reporter)

मुंबई Ajit Pawar :शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी करत अजित पवार यांनी स्वतंत्र गट स्थापन करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरच दावा केला; परंतु त्यानंतर झालेल्या प्रत्येक घडामोडी आणि काही महिन्यांच्या अंतरावर होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुका पाहता उपमुख्यमंत्री अजित पवार हे काहीतरी नवीन करण्याच्या तयारीत दिसत आहेत. मागील १० दिवसात अजित पवार यांनी दोनदा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली आहे. त्याचबरोबर लोकसभा, विधानसभेत महायुती म्हणून आम्ही एकत्र असलो तरीसुद्धा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वतंत्र लढवण्याचा निर्णय त्यांनी घेतल्यानं अजित पवारांची पावलं महायुतीतून बाहेर पडण्याच्या दिशेने तर पडत नाहीत ना? असाही तर्क लावला जात आहे. याला कारण म्हणजे महायुतीचं विधानसभेसाठी होणारं जागावाटप हेसुद्धा आहे.

अजित पवार गटाकडून दबाव :मागील १० दिवसांच्या अजित पवार यांच्या घडामोडी पाहिल्या तर अजित पवार हे महायुतीमध्ये दबाव निर्माण करत आहेत का? असं चित्र दिसून येतं. मागील १० दिवसात अजित पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची दोनदा भेट घेतली आहे. विशेष म्हणजे, लोकसभेत फक्त ४ जागा त्यांच्या वाट्याला आल्या. त्यातसुद्धा बारामती सारख्या लोकसभा मतदारसंघात त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा झालेला पराभव हा त्यांच्यासाठी फार मोठा धक्का होता. आता मागच्या दारानं राज्यसभेसाठी सुनेत्रा पवार यांची वर्णी लावण्यात आली असली तरी लोकसभेमध्ये जो फटका बसला तो विधानसभेत बसू नये यासाठी अजित पवार सावध पावलं उचलताना दिसत आहेत.

अजित पवार गटावर नाराजी :अजित पवार गट महायुतीत आल्यानं त्याचा फटका लोकसभेत बसला असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुखपत्र असलेल्या विवेक साप्ताहिक मधून सांगण्यात आलं होतं. तर दुसरीकडे अजित पवारांना महायुतीत घेतल्यानं भाजपा तसंच शिंदे गटाच्या अनेक आमदार, नेत्यांनी नाराजीसुद्धा दर्शवली होती. अशा परिस्थितीत अजित पवार यांच्यावर असलेले सिंचनाचे आरोप, शरद पवार यांच्यासोबत दगा फटका केल्यानं पवार गटाला मिळणारी सहानुभूती या कारणानं अजित पवार महायुतीत नको असं उघडपणे जरी कोणी बोलत नसलं तरीसुद्धा अनेकांची ती मनापासून इच्छा आहे. त्यातच निधीवाटपावरून अजित पवारांचे भाजपा त्याचबरोबर शिंदे गटाच्या आमदारांशी वाद झाले आहेत. त्यात अजित पवार गटाचे आमदार सत्तेमध्ये असूनसुद्धा अनेक जण नाखूश आहेत.

भाजपाच्या उमेदवाराकडून धोका :लोकसभेला रस्सीखेच करून जेमतेम ४ जागा अजित पवार गटाला मिळाल्या होत्या. आता विधानसभेला किती जागा देतील यावर साशंकता आहे. लोकसभेला जे झालं ते विधानसभेला होऊ नये म्हणून अजित पवार गटाकडून दबाव निर्माण केला जात आहे का? अशीही शक्यता वर्तवली जात आहे. आताच्या घडीला अजित पवार यांच्यासोबत ४१ आमदार आहेत. त्यातील २० आमदार २०१९ या मागच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या उमेदवाराचा पराभव करून विधानसभेत पोहोचले आहेत. ८ आमदारांनी आता शिवसेना शिंदे गटासोबत असलेल्या उमेदवारांचा पराभव केला आहे. याचाच अर्थ अजित पवारांच्या ४१ आमदारांपैकी २८ आमदारांचा मुकाबला हा भाजपा आणि शिंदे गटाच्या उमेदवारांविरोधात होता.

महायुतीत भाजपा मोठा भाऊ :अजित पवारांच्या ९ मंत्र्यांपैकी ७ मंत्र्यांनी मागच्या विधानसभेत भाजपाच्या उमेदवाराशी सामना केला होता. अशा परिस्थितीमध्ये अजित पवार गटाच्या अनेक विद्यमान आमदारांना महायुती म्हणून पुन्हा निवडणुकीला सामोरे जाताना त्यांच्या मतदारसंघात भाजपाकडूनच धोका निर्माण होऊ शकतो, अशी शक्यता जास्त वाटत आहे. म्हणून हे आमदारसुद्धा संभ्रमावस्थेत आहेत. त्यातच जागा वाटपाचा तिढा सुटता सुटत नाही. महायुतीत भाजपा मोठा भाऊ असून ते त्यांचा अधिकार मोठ्या भावाप्रमाणेच घेतील, तर आपणाला फार कमी जागा मिळतील. त्यासुद्धा अखेरच्या क्षणी दिल्या गेल्या तर लोकसभेसारखं चित्र निर्माण होऊ शकतं अशी शक्यताही अजित पवार गटाच्या आमदारांना वाटत आहे. त्यात अजूनही राष्ट्रवादी काँग्रेस त्याचबरोबर शिवसेना यांच्या पक्षाच्या नावासंदर्भात आणि चिन्हासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रलंबित आहे. जोपर्यंत त्याचा निकाल येत नाही तोपर्यंत ही टांगती तलवार दोन्ही पक्षांच्या नेत्यांवर असणार आहे.

शरद पवारांकडून उमेदवारांची चाचपणी :दुसरीकडे राष्ट्रवादी शरद पवार गटाने आमदारकीसाठी उमेदवारांची चाचपणी सुरू केली असून काही मतदारसंघात उमेदवारसुद्धा जवळपास निश्चित करण्यात आले आहेत. प्रचारात जेवढ्या लवकर आघाडी घेतली जाईल तितका उमेदवाराला फायदा होतो हे शरद पवारांना चांगलं ठाऊक आहे. म्हणूनच शरद पवार गटाने विधानसभेसाठी संपूर्ण महाराष्ट्राचा आढावा घ्यायला सुरुवात केली असून काही उमेदवार जवळपास निश्चित केले आहेत.


'ही' आहेत निश्चित उमेदवारांची नावं :

तासगाव - रोहित पाटील
अकोले - अमित भांगरे
माळशिरस - उत्तमराव जानकर
करमाळा - नारायण पाटील
भोसरी - अजित गव्हाणे
दिंडोरी - गोकुळ झिरवाळ
पारनेर - राणी लंके

हेही वाचा :

  1. "लाडका भाऊ-लाडकी बहीण आतापर्यंत एकत्र राहिले असते तर..." राज ठाकरेंचा कुणाला टोला? - Raj Thackeray on Assembly election
  2. दरेकर जरांगेंचा कलगी तुरा; जरांगे म्हणतात, 'कपाळावर कुंकू लावले तर ते...', तर दरेकर म्हणतात 'जरांगेंच्या नौटंकीला मराठा समाज भुलणार नाही' - Manoj Jarange Patil
  3. देवेंद्र फडणवीस माझ्या विरोधात अभियान राबवत आहेत: मनोज जरांगेंचा पुन्हा हल्लाबोल - Manoj Jarange On Devendra Fadnavis

ABOUT THE AUTHOR

...view details