हैदराबाद : भारत हा कृषीप्रधान देश आहे. कृषीशी निगडित अनेक सण देशातील विविध राज्यात साजरे केले जातात. असाच एक सण म्हणजे दर्श वेळा अमावस्या (Vel Amvasya) होय. याला 'येळवस' असंही म्हणतात. मराठवाड्यात हा सण मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. शेतातील काळ्या आईचं ऋण फेडण्यासाठी शेतकरी तिची मनोभावे पूजा करतो. 'वेळा अमावस्या' (Amavasya) साजरी करण्याची अनेक वर्षापासून परंपरा आजही मराठवाड्यात पाळली जाते.
रब्बी हंगामासाठी देवाकडं प्रार्थना : पेरणीनंतर येणाऱ्या सातव्या अमावस्येला 'येळवस' साजरी केली जाते. या दिवशी शेतात कडब्याच्या खोपीत लक्ष्मी देवीची प्रतिष्ठापना केली जाते आणि तिला नैवद्य दाखवला जातो. शेतातील पांडवांना नवा रंग दिला जातो. तसंच रब्बी हंगामातील पिके गहू, हरभरा, ज्वारी, करडई, सुर्यफूल आदी पिकात चर शिंपून पीक चांगलं येऊ दे, अशी देवाकडं प्रार्थना केली जाते. यानंतर भोजनाचा आनंद लुटला जातो. मूळ कर्नाटकी असणारा हा सण महाराष्ट्रात धाराशिव, लातूर, सोलापूर आणि परळीच्या काही भागात साजरा केला जातो.
हिवाळ्यात साजरी केली जाते दर्श वेळा अमावस्या : आयुर्वेदानुसार, ऋतूनुसार घेतला जाणारा आहार शरीरास पोषक असतो. हिवाळ्यात फळे आणि पालेभाज्या खाण्याचा सल्ला दिला जातो. हिवाळ्यात भूक जास्त लागते तसंच पचनसंस्था चांगली राहाते. शरीर कोरडं पडू नये यासाठी अनेकदा स्निग्ध पदार्थांची आवश्यकता असते. यामुळं वेळा अमावस्येला बाजरीची भाकरी आणि गरम पदार्थांची मेजवानी असते. या दिवशी सोळा भाज्या एकत्र करून त्याची भाजी बनवली जाते. त्याचबरोबर बाजरीचं पीठ उकडून त्याचे उंडे बनवले जातात. गूळ शरीरासाठी उष्ण असतो म्हणून गूळ घालून गव्हाची खीर बनवली जाते. तसंच हे सगळे पचवण्यासाठी ज्वारीचं पीठ रात्रभर ताकात भिजवून आंबील बनवली जाते.
(टीप: सदरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे, 'ईटीव्ही भारत' यातील माहितीच्या सत्यतेचा दावा करत नाही.)
हेही वाचा -