महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नाव मोठं लक्षण खोटं! आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका पावसाळ्यात देऊ शकत नाही मुलभूत सुविधा - Mumbai Rain

Mumbai Heavy Rain : रविवार रात्रीपासून सुरु असलेल्या पावसानं मुंबईतील उपनगरी रेल्वे वाहतूक, बस सेवा सर्वच ठप्प झाल्यानं मुंबईकर हैराण झाला आहे. दरवर्षी पावसात 'मुंबईची तुंबई' या बातम्या नेहमीच्या झाल्या आहेत. करोडो रुपये बजेट असलेल्या या मायानगरीत दरवर्षी असं का होतं? जाणून घ्या पाणी कुठं मुरतंय...

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 8, 2024, 9:51 PM IST

Updated : Jul 8, 2024, 10:02 PM IST

Mumbai Heavy Rain
मुंबईची तुंबई (ETV Bharat)

मुंबई Mumbai Heavy Rain :रविवारी रात्रीपासून सुरु झालेला पाऊस अद्याप थांबायचं नाव घेत नाही. अशातच मुंबईतील उपनगरी रेल्वे वाहतूक, बस सेवा सर्वच ठप्प झाल्यानं मुंबईकर हैराण झाला आहे. दरवर्षी पावसात 'मुंबईची तुंबई' या बातम्या नेहमीच्या झाल्या आहेत. त्यामुळं आता बृहन्मुंबई महानगरपालिकेला मुंबईकरांच्या रोषाला समोरं जावं लागत असून, आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका, 80 हजार कोटींच्या ठेवी ठेवणारी महानगरपालिका, देशातील आठ राज्यांच्या अर्थसंकल्पाहून मोठा अर्थसंकल्प मांडणारी महानगरपालिका अशी ओळख असतानाही पालिका प्रशासन पावसाळ्यात किमान सुविधा देऊ शकत नाही का? असा प्रश्न सध्या मुंबईकर विचारत आहेत.

आशियातील सर्वात श्रीमंत मनपा : बृहन्मुंबई महानगरपालिका ही देशातीलच नव्हे तर आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका असल्यानं या महानगरपालिकेवर आपली स्वतःची सत्ता असावी यासाठी सर्वच पक्ष धडपडत असतात. पण, मुंबईकरांना सुविधा देण्यात हे सर्वच पक्ष मागची वर्षानुवर्ष अपयशी ठरत आहेत. नगरसेवकांचा कार्यकाळ संपल्यानंतर मागील दोन वर्ष बृहन्मुंबई महानगरपालिकेत प्रशासकीय राजवट आहे. तत्कालीन महानगरपालिका आयुक्त व प्रशासक इकबाल सिंह चहल यांच्या मार्गदर्शनाखाली 4 फेब्रुवारी 2024 रोजी महानगरपालिकेनं आपला आर्थिक वर्ष 2024-25 चा अर्थसंकल्प सादर केला. हा अर्थसंकल्प 59 हजार 954 कोटींचा असून देशातील आठ राज्यांच्या अर्थसंकल्पातून मोठा आहे. यात अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, मणिपूर, मेघालय, त्रिपुरा, नागालँड, मिझोराम ईशान्यकडील ही सात राज्य व गोवा अशा एकूण आठ राज्यांचा समावेश होतो. मात्र, तरी देखील दरवर्षी पावसाळ्यात मुंबई महानगरपालिका मुंबईकरांना जलमय रस्ते दाखवते.

नाले सफाईसाठी 284 कोटींचा खर्च : 'नाले सफाईच्या कामासाठी मुंबई महानगरपालिका दरवर्षी करोडो रुपयांचा निधी खर्च करते' हे वाक्य आता मुंबईकरांच्या देखील एक जीवनाचा भाग झाला आहे. मात्र, मुंबई महानगरपालिका या नालेसफाईच्या कामांवर जो निधी खर्च करते त्याचा आकडा देखील मोठा आहे. नाले सफाईसाठी महापालिका यावर्षी 284 कोटी रुपयांचा निधी खर्च करत आहे. जानेवारी महिन्यातच महापालिकेनं निविदा काढून कामाला सुरुवात केली होती. यात एप्रिल महिन्यापर्यंत 37 टक्के काम पूर्ण झाल्याची माहिती पालिकेकडून देण्यात आली होती. पण, मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंतही महापालिकेत 50 टक्के उद्दिष्ट पूर्ण झालेलं नव्हतं. आता महानगरपालिकेनं मुंबईतील नालेसफाई चे 90 टक्के काम पूर्ण झाल्याचं म्हटलं आहे. मात्र, हे 90 टक्के काम दरवर्षी पावसाळ्यात दिसत नाही ही शोकांतिका आहे. महापालिका क्षेत्रात 254 किमी मोठे नाले आणि 444 किमीचे छोटे नाले असून, त्यापैकी 21.5 किमी लांबीची मिठी नदी आणि 12 किमी लांबीची दहिसर नदी आहे. यावर्षी महापालिकेकडून शहरातील नाले सफाईसाठी मुंबई शहराला 60 कोटी रुपये आणि पूर्व व पश्चिम उपनगरांसाठी अनुक्रमे 79 कोटी व 145 कोटी रुपये असा एकूण 284 कोटी रुपये खर्च केला आहे.

2005 मध्ये अतिवृष्टीमुळं सर्वाधिक नुकसान : जुलै 2005 मध्ये मुंबईत अतिवृष्टीमुळं सर्वाधिक नुकसान झालं. 26 जुलै 2005 रोजी मुंबईत 24 तासांत 900 मिमी पेक्षा जास्त पाऊस झाला. इतक पर्जन्यमान म्हणजे संपूर्ण जुलै महिन्यातला पाऊस 24 तासात झाल्याचं त्यावेळी तज्ञांनी म्हटलं होतं. त्यामुळं शहरातील रस्ते बंद झाले होते. बस, रेल्वे आणि विमानसेवा ठप्प झाली होती आणि संपूर्ण मुंबई शहर पाण्याखाली गेलं होतं. त्या महाप्रलयात बुडून 1094 जीव गेले, तर सुमारे 500 कोटी रुपयांचं नुकसान झालं होतं. 2005 च्या महाप्रलयानंतर शासन आणि प्रशासन दोघांनाही जाग आली आणि तेव्हापासून मुंबईत सातत्यानं पावसाळापूर्व नियोजन सुरु आहे. मात्र, 2005 ते 2024 मागील जवळपास 20 वर्षात दरवर्षी मुंबईत पाणी तुंबत असल्यानं प्रशासन नेमकं कोणत्या प्रकारचं नियोजन करतंय? हा प्रश्न पडतो.

सात बेटांपासून बनलेलं शहर : हे झालं पालिकेच्या कामाबाबत. आता मुंबई शहराची थोडी भौगोलिक रचना देखील लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. मुंबई हे शहर सात बेटांपासून तयार झालं आहे. हे शहर समुद्रात भराव टाकून वसवण्यात आलं. ही माहिती सर्वांनाच माहित असून सर्वांच्या परिचयाची आहे. मात्र, हे शहर केवळ अरबी समुद्रानं वेढलेलं नाही, तर मिठी, दहिसर, ओशिवरा आणि पोयसर या चार नद्याही आहेत. नद्यांव्यतिरिक्त इथं चार खाड्या आहेत. या नद्या आणि खाड्यांना आज एखाद्या नाल्याचं स्वरूप आल्यानं हे सर्व मिळून सुमारे 21 दशलक्ष लोकसंख्या असलेल्या शहराला पावसाळ्यात तलाव बनतात. यासाठी मिठी नदीचं उदाहरण उत्तम आहे. संपूर्ण मुंबईला वेढलेल्या या नदीची रुंदी बहुतेक ठिकाणी फक्त 10 मीटर आहे. अशा स्थितीत थोडा पाऊस झाला तरी नदी धोकादायक बनते. अशातच या शहराची ड्रेनेज व्यवस्था अशी आहे की, सांडपाणी थेट समुद्रात जाते. अशावेळी मुसळधार पावसात समुद्राची पातळी वाढल्यावर आणि भरतीच्या वेळी समुद्रात सोडलेलं सांडपाणी पुन्हा शहरात येण्यापासून रोखण्यासाठी नाल्यांचे दरवाजे बंद केले जातात. मुसळधार पाऊस आणि उंच लाटा उरलेल्या ड्रेनेज सिस्टीमला अडचणीच्या ठरतात. ओहोटीनंतर पावसाळ्यात तुंबलेल्या पाण्याचा उपसा करणाऱ्या या यंत्रणेला पुन्हा आपल्या कामाला सुरुवात करावी लागते.

दरवर्षी गाळ काढण्याचं काम : यासंदर्भात महानगरपालिका प्रशासनाने म्हटलं की, "बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पर्जन्य जलवाहिन्या विभागाच्या वतीनं दरवर्षी पावसाळ्यापूर्वी मुंबई महानगरातील मोठ्या नाल्यांमधून तर विभाग कार्यालयांच्या वतीनं लहान नाल्यांमधून गाळ काढण्याची कामं केली जातात. मुंबई महानगरातील पर्जन्यमान आणि पावसाची तीव्रता लक्षात घेऊन, नाल्यांमधून किती गाळ काढणं आवश्यक आहे, याचा अभ्यास करुन गाळ उपशाचं उद्दिष्ट दरवर्षी निश्चित केलं जातं. त्यानुसार, वार्षिक उद्दिष्टांपैकी पावसाळ्यापूर्वी म्हणजे दिनांक 31 मेपर्यंत मोठ्या नाल्यातील 75 टक्के गाळ काढण्याचं उद्दिष्ट होतं." या उद्दिष्टानुसार 31 मे 2024 पर्यंत मुंबईतील नाल्यांमधून 10 लाख 22 हजार 131 दशलक्ष टन इतका गाळ काढण्यात आल्याचं महानगरपालिकेनं म्हटलं आहे. सोबतच पावसाच्या दिवसात म्हणजे 1 जूनपासून नाल्यांमधून 15 टक्के काढण्याचं उद्दिष्ट असल्याचं महानगरपालिकेनं म्हटलं आहे. त्यानुसार, 1 जून 2024 ते 21 जून 2024 दरम्यान विविध नाल्यांमधून एकूण 1 लाख 15 हजार 473 दशलक्ष टन इतका गाळ काढण्यात आलेला आहे. तर, पावसाळ्यानंतर उर्वरित 10 टक्के गाळ काढण्याचं उद्दिष्ट असल्याचं महानगरपालिकेनं म्हटलंय.

हेही वाचा :

  1. मुसळधार पावसामुळं मुंबईत पाणी साचलंय; 'वेळ आलीच तर मदतीसाठी सैनिक, नौदल, हवाई दल तयार', मुख्यमंत्री शिंदेंची माहिती - CM Eknath Shinde
  2. मुंबई पुन्हा तुंबली; पावसाला तोंड देण्यास बीएमसी आणि रेल्वेची यंत्रणा अपयशी - Mumbai Heavy Rain
Last Updated : Jul 8, 2024, 10:02 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details