मुंबई-विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यातील महिलांना खुश करण्यासाठी सरकारनं आणलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कमालीची लोकप्रिय ठरत आहे. अशातच अर्ज करण्यासाठी राज्य सरकारकडून मुदतवाढ देण्यात आली आहे. ज्यांनी मागील दोन महिन्यांमध्ये अर्ज केले नाहीत, ते अद्यापही अर्ज करू शकतात. परंतु त्यांना जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांचे पैसे मिळणार नाहीत, अशी महत्त्वपूर्ण माहिती महिला आणि बाल विकास विभागाच्या मंत्री अदिती तटकरे यांनी दिली.
३० सप्टेंबरपर्यंत मुदत वाढ-मुख्यमंत्री माझी लाडकी बहीणयोजनेसाठी अर्ज करण्यासाठी ३१ ऑगस्ट ही शेवटची तारीख होती. परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे अनेक महिलांना ठराविक वेळेत अर्ज करता आले नाहीत. बँक खाते आधार कार्डशी लिंक नसल्यानंही अनेकांना अडचणी आल्या आहेत. त्यामुळे राज्य सरकारनं लाडकी बहीण योजनेत अर्ज भरण्याची मुदत ३० सप्टेंबरपर्यंत वाढविली आहे.
४,५०० रुपये कोणाला भेटणार?या योजनेविषयी बोलताना महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या, "राज्य सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, ही राज्यात सर्व दूर मोठ्या प्रमाणात पसरली आहे. या योजनेसाठी आतापर्यंत राज्यातील एक कोटींपेक्षा जास्त महिलांनी अर्जसुद्धा दाखल केले आहेत. आतापर्यंत या योजनेतून महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे असे दोन हप्त्यांचे एकूण तीन हजार रुपये खात्यात जमा केले आहेत. काही ठिकाणी जुलै महिन्यात अर्ज केलेल्या काही महिलांचे अर्ज तांत्रिक अडचणीमुळे नामंजूर झाले आहेत. तर काही महिलांनी उशिरा अर्ज केल्यामुळे त्यांच्या अर्जांची पडताळणी आणि छाननी अजून बाकी आहे. अर्जांची पडताळणी आणि छाननी झाल्यानंतर या महिलांना जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या ३ महिन्याचे एकूण ४,५०० रुपये त्यांच्या खात्यात जमा होतील. परंतु सप्टेंबर महिन्यात अर्ज करणाऱ्या महिलांना फक्त या महिन्याचे पैसे भेटतील.