महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

संजय राऊत शिवसेना सोडणार? नितेश राणेंच्या वक्तव्यानं चर्चांना उधाण - NITESH RANE ON SANJAY RAUT

शिवसेना (उबाठा) नेते संजय राऊत एका खासदाराच्या मदतीनं काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याचा दावा मंत्री नितेश राणे यांनी केला.

NITESH RANE ON SANJAY RAUT
नितेश राणे आणि संजय राऊत (संग्रहित छायाचित्र)

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 2, 2025, 5:25 PM IST

Updated : Feb 2, 2025, 9:49 PM IST

नागपूर : शिवसेना (उबाठा) नेते संजय राऊत एका खासदाराच्या मदतीनं काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याचा दावा भाजपा आमदार आणि मंत्री नितेश राणे यांनी केलाय. त्यामुळं राजकीय क्षेत्रात विविध चर्चांना उधाण आलंय. याबाबत संजय राऊत यांच्याकडून अजून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. नेमकं काय म्हणाले नितेश राणे वाचा...

राऊत काँग्रेसच्या संपर्कात : "संजय राऊत काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यासाठी दिल्लीतील एका नेत्याशी चर्चा करत आहेत. राऊत यांचा राज्यसभेचा कार्यकाळ संपुष्टात येत असून, उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडं पुन्हा राऊतांचा विजय निश्चित करण्यासाठी पुरेसे आमदार नाहीत. काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यासाठी दिल्लीत ज्या नेत्याशी चर्चा सुरू आहे त्याबद्दल राऊतांनी 'सामना'मध्ये लिहावं," असं म्हणत नितेश राणे यांनी संजय राऊतांवर टीका केली.

माध्यमांशी बोलताना मंत्री नितेश राणे (ETV Bharat Reporter)

'सामना'मध्ये लिहावं :संजय राऊत यांच्या काँग्रेसमधील प्रवेशाबाबत बोलताना मंत्री नितेश राणे म्हणाले की, "आदित्य ठाकरेंमुळं पक्षातील नेत्यांमध्ये खदखद आहे. त्यामुळं संजय राऊत तरी पक्षात किती काळ टिकणार आहेत? हे संजय राऊत यांनीच 'सामना'मध्ये लिहावं." नितेश राणे यांनी यावेळी उद्धव ठाकरे यांच्यावरही हल्लाबोल केला. "उद्धव ठाकरे यांना स्वतःचा धर्म नाही, त्यांचं राजकीय धर्मांतरण झालंय." असं म्हणत मंत्री नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.

संजय शिरसाटांना चिमटा : दोन्ही शिवसेना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं विधान शिवसेना नेते आणि मंत्री संजय शिरसाट यांनी केलं होतं. यावर मंत्री नितेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली. संजय शिरसाट यांनी मध्यस्थी करण्याआधी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या आमदारांची मतं जाणून घ्यावी, संजय शिरसाट आमचे मित्र आहेत. त्यांचा संजय राजाराम राऊत होऊ नये इतकीच अपेक्षा असल्याचंही नितेश राणे म्हणाले.

महाराष्ट्रात राहू देणार नाही : "महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या कोणत्याही बांगलादेशींना आम्ही राहू देणार नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात भूमिका स्पष्ट केली. राज्यात सर्वत्र बांगलादेशी घुसखोरांवर कारवाई सुरु आहे. मात्र, येत्या काळात कारवाईचा वेग अधिक तीव्र केला जाणार आहे," असा इशारा मंत्री नितेश राणे यांनी दिला. सरकारी यंत्रणेत जे अधिकारी खोटी कागदपत्र करण्यास बांगलादेशींना मदत करतात, त्यांची नावं सरकारकडं आली आहेत. त्यांच्यावर पण कारवाई करणार असल्याचं नितेश राणे यांनी सांगितलं.

हेही वाचा :

  1. देवदर्शनावरून परतताना दरीत कोसळली बस, 7 जणांचा जागीच मृत्यू
  2. पोलिसांचा खबरी असल्याचा संशय, नक्षलवाद्यांकडून माजी सभापतीची हत्या
  3. दिलासादायक! ससूनमधील पाच रुग्णांची 'जीबीएस'वर यशस्वी मात; डिस्चार्ज मिळाल्यानंतर म्हणाले...
Last Updated : Feb 2, 2025, 9:49 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details