मुंबई- महायुती सरकार दुसऱ्यांदा सत्तेत आल्यानंतर पहिले विशेष अधिवेशन पार पडत आहे. या तीन दिवसीय अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकार आज विधानसभेत बहुमत सिद्ध करणार आहे. एकवेळ एकच अर्ज आल्यानं राहुल नार्वेकर हे बिनविरोध निवडून आले आहेत.
Live updates-
- "लाडकी बहीण योजनेसंदर्भात तक्रार आलेली नाही. लाडकी बहीण योजनेच्या अर्जांची छाननी करण्याचा निर्णय घेण्यात आलेला नाही. पुढील अधिवेशनात लाडकी बहीण योजनेसाठी २१०० रुपयांची घोषणा होईल. सध्या १५०० रुपये मिळणार आहेत. लाडकी बहीण योजनेचे निकष बदलणार नाहीत," अशी माहिती माजी महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी विधानभवानाबाहेर माध्यमांशी बोलताना दिली.
- काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार म्हणाले, " कधीही न रागावणारे अध्यक्ष आम्ही पाहिले. तुमचा आवाज वाढला तरी बोचणारा नसायचा. कधीही तुम्ही वेदना होईल, असे कधी बोलले नाहीत. विरोधक म्हणून आमची भूमिका मांडू, ती जनतेची भूमिका मांडू. संख्या बदलत असते. महाराष्ट्राची राजकीय परंपरा आहे, तीच परंपरा कायम राहील, अशी अपेक्षा आहे". पुढे आमदार वडेट्टीवार म्हणाले, " संख्याबळ कमी असल्यानं आवाज कमी आहे. मात्र, बसून कोणी बदलले तरी आवाज दबला जाईल. त्यामुळे विरोधकांचा आवाज दबणार नाही. दोन्ही डोळे, दोन्ही कान हे दोन्ही बाजू ऐकतील अशी अपेक्षा आहे".
- "लोकशाही मजबूत झाली पाहिजे. बाबासाहेब आंबेडकर यांची कर्मभूमी राहीली आहे. शाहू, फुले आणि आंबेडकर यांचा विचार देणारी भूमी आहे. लोकशाही मजबूत व्हावी, यावर चर्चा व्हावी," अशी अपेक्षा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली.
- "राहुल नार्वेकर यांच्यामध्ये नेतृत्वगुण आहेत. नार्वेकर हे बिनविरोध निवडून आले, ही त्यांची कार्यक्षमता आहे. प्रख्यात वकील म्हणून नार्वेकरांची ओळख आहे", असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नवनिर्वाचित अध्यक्षांचे कौतुक करताना म्हटले. "महाराष्ट्राची विधानसभा देशाला दिशा देणारी आहे. तेव्हा विरोधकांनी ताळतंत्र सोडले. मात्र, त्यांनी संयमानं निकाल दिला. हा निकाल सभागृहाच्या परंपरेला साजेसा देणारा होता".
- राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदी निवड झाल्यानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिनंदन केले. ते म्हणाले, "विरोधी बाकावरील संख्या चिंताजनक आहे. काही लोक दिसत नाहीत, असा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या आमदारांना (यूबीटी) टोला लगावला. विरोधकांना वारे कळाले असती तर त्यांची दुर्दशा झाली नसती. जनभावनेचा आदर करा. फक्त विरोधाला विरोध करण्याचे विरोधकांनी सोडून द्यावे," असे आवाहन उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केले. "काँग्रेसनं दाखविलेल्या संविधानात बाबासाहेबांना दोनदा पराभूत केले. काँग्रेसला ५० ते ६० वर्षात संविधानाची आठवण झाली नाही," अशी टीकादेखील त्यांनी काँग्रेसवर केली.
- बेळगाव केंद्रशासित करण्याच्या मागणीसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आदित्य ठाकरे आणि इतर आमदारांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर बसून आंदोलन केले. बेळगाव केंद्रशासित प्रदेश झालाच पाहिजे, अशी घोषणाबाजी करण्यात आली.
- विधानसभेच्या अध्यक्षपदी भाजपाचे आमदार राहुल नार्वेकर यांची एकमतानं निवड झाली. नार्वेकर यांनी मागील युती सरकारमध्येदेखील विधानसभेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या प्रस्तावावर अनिल पाटील यांचं अनुमोदन, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रस्तावावर आशिष शेलार यांचं अनुमोदन, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रस्तावावर चंद्रकांत पाटील यांचं अनुमोदन होते.
- विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनाच्या पहिल्या आणि दुसऱ्यादिवशीही ईव्हीएमचा गैरवापर होत असल्याचा महाविकास आघाडीकडून महायुतीवर आरोप करण्यात आला.
अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी काय घडलं?
- अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी (शनिवारी) महाविकास आघाडीच्या नवनिर्वाचित आमदारांनी ईव्हीएमच्या मुद्द्यांवरून शपथ घेण्यास नकार दिला. महायुतीच्या १७३ आमदारांनी आमदारकीची शपथ घेतली. यामध्ये महायुतीसह इतर पक्ष, अपक्ष आणि समाजवादी पक्षाच्या आमदाराचा समावेश आहे. तर महाविकास आघाडीच्या आमदारांनी सभात्याग केला.