महाराष्ट्र

maharashtra

विशाळगड प्रकरणावरुन विरोधक आक्रमक; नाना पटोलेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र तर जयंत पाटलांची सोशल मीडियावरुन टीका - Vishalgad Violence Case

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 17, 2024, 10:33 PM IST

Vishalgad Violence Case : विशाळगड अतिक्रमण मुक्त आंदोलनाला रविवारी हिंसक वळण लागलं. त्यानंतर गडाच्या पायथ्याशी असलेल्या गजापूर गावात जमावानं अनेक घरांना लक्ष्य करत जाळपोळ केली. यावरुन आता विरोधकांनी सरकारला धारेवर धरलय.

Vishalgad Violence Case
विशाळगड प्रकरणावरुन विरोधक आक्रमक (ETV Bharat MH Desk)

मुंबई Vishalgad Violence Case : महाराष्ट्रात राजकीय फायद्यासाठी राजर्षी शाहू महाराज यांच्या करवीर नगरीत सामाजिक सलोखा बिघडवण्याचं पाप करणं अत्यंत दुर्देवी आणि चिंताजनक आहे. विशाळगड हिंसाचार प्रकरणामुळं महाराष्ट्राला काळीमा फासला गेला आहे. अतिक्रमणाच्या नावाखाली गजापूर गावात घडलेला प्रकार राज्यासाठी घातक आहे. त्यामुळं अशा दंगेखोरांच्या तत्काळ मुसक्या आवळून कठोर कारवाई करण्याची मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एका पत्राद्वारे केली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत निषेध व्यक्त केला आहे.

नाना पटोले यांनी लिहिलेलं पत्र (ETV Bharat Reporter)
नाना पटोले यांनी लिहिलेलं पत्र (ETV Bharat Reporter)


काय लिहिलंय पत्रात : महाराष्ट्र ही साधू संतांची, थोर पुरुषांची, विचारवंत आणि समाजसुधारकांची भूमी आहे. शिव-शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचारांवर चालणारं पुरोगामी राज्य अशी महाराष्ट्राची ओळख आहे. पण गेल्या काही दिवसांपासून आपल्या राजकीय फायद्यासाठी सत्ताधारी पक्षातील काही नेते प्रक्षोभक वक्तव्यं करुन राज्यात हिंदू मुस्लीम तेढ निर्माण करण्याचा जाणिवपूर्वक प्रयत्न करत आहेत. विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जाणीवपूर्वक धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रकार अत्यंत घातक आणि महाराष्ट्राच्या प्रतिमेला कलंक लावणारा असल्याचं पटोले म्हणाले.

नाना पटोले यांनी लिहिलेलं पत्र (ETV Bharat Reporter)

विशाळगडावरील अतिक्रमणं काढली पाहिजेत : आपलं दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांचा वारसा सर्वांनी जपला पाहिजे. विशाळगडावरील अतिक्रमण काढण्यास कोणाचं दुमत नाही. मात्र अतिक्रमणासंदर्भात प्रकरण न्यायालयात आहे. सरकारकडून सदर प्रकरणात वेळकाढूपणा सुरू आहे. अशावेळी अचानकपणे अतिक्रमणाच्या नावाखाली एका धर्माच्या लोकांवर आणि घरांवर हल्ला करणं, माराहाण करणं हे माणुसकीला काळीमा फासणारं आहे. विशाळगडावरील अतिक्रमण आणि गजापूर गावातील दंगल हे दोन्ही वेगळे विषय असल्याचं नाना पटोले यांनी पत्रात नमूद केलं आहे. तसंच उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या विधानानं राज्यात शांतता प्रस्थापित करण्यासाठी आणि दंगेखोरांवर कारवाई करण्याबाबत नसून विशिष्ट धर्माला भीती घालणं, दंगेखोरांना पाठीशी घालणं तसंच प्रकरणाला वेगळं वळण देणारं आहे. गृहमंत्र्यांच्या विधानाचा मी निषेध करतो. 14 जुलैचा हिंसचार हा सरकार आणि प्रशासनाचं अपयश नाही तर सरकारच्या पाठबळामुळं झालेला गुन्हा असल्याचा आरोप पटोले यांनी केला आहे.


या प्रवृत्तींना ठेचून काढा : माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी विशाळगडावरील अतिक्रमण काढण्यासंदर्भात हाक दिली होती. त्यासाठी हजारो तरुण विशाळगडाकडे येणार, याची कल्पना असूनही प्रशासन आणि पोलिसांनी योग्य ती खबरदारी घेतली नाही. गजापूर गावातील ज्या लोकांचं नुकसान झालं आहे, त्यांना सरकारनं तातडीनं मदत केली पाहिजे. तसंच प्रचंड दहशतीत असलेल्या गावकऱ्यांना सरकारनं विश्वास दिला पाहिजे. सरकारनं यासंदर्भात सखोल चौकशी करुन दोषी अधिकाऱ्यांवरही कारवाई केली पाहिजे. राज्यात सामाजिक सलोखा व शांतता रहावी यासाठी राज्याचे प्रमुख म्हणून अशा अपप्रवृत्तींना पायबंद घालण्याची आपली जबाबदारी आहे. राजकीय फायद्यासाठी कोणी धर्माच्या नावाखाली वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करत असेल तर ते कदापी खपवून घेतलं जाणार नाही. राजकारण बाजूला ठेवून महाराष्ट्राच्या हितासाठी या अपप्रवृत्तींना ठेचून काढा, असंही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले.



ही कृती छत्रपती शिवाजी महाराजांना देखील आवडली नसती : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही सोशल मीडियाच्या माध्यमातून निषेध व्यक्त केला आहे. विशाळगडाच्या पायथ्यापासून दोन किलोमीटर असलेल्या गजापूर मधील एका विशिष्ट धर्माच्या धार्मिक स्थळाची तोडफोड करण्याची कृती झाली आहे. या कृतीचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे वतीनं निषेध करत आहोत. शिवप्रेमाच्या नावाखाली हिंसाचार व दंगल करण्याची कृती खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांना देखील आवडली नसती असं मत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केलं आहे.

हेही वाचा :

  1. विशाळगडावर तणावपूर्ण शांतता; शाहू महाराजांनी नुकसानग्रस्तांना दिला आधार - Vishalgad Violence Case
  2. विशाळगड हिंसाचार प्रकरण; 21 जण ताब्यात तर 500 ते 600 जणांवर गुन्हे दाखल, संभाजीराजेंबाबत पोलिसांचं मौन - Vishalgarh Violence Case

ABOUT THE AUTHOR

...view details