महाराष्ट्र

maharashtra

"विरोधकांनी जनतेला दीड रुपया..."; अजित पवारांचा हल्लाबोल - Ajit Pawar Vidhan Sabha Election

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 11, 2024, 7:46 AM IST

Ajit Pawar Vidhan Sabha Election : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधकांनी प्रचाराला सुरुवात केली. विविध ठिकाणी प्रचार सभा आयोजित केल्या जात आहेत. अशातच शनिवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोपरगाव येथे जनसन्मान यात्रेत जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सरकार राबवत असलेल्या विविध योजनांची माहिती दिली.

ajit pawar
उपमुख्यमंत्री अजित पवार (Source : ETV Bharat Reporter)

शिर्डी (अहमदनगर) Ajit Pawar Vidhan Sabha Election : जनसन्मान यात्रेतून अजित पवारांनी विरोधकांवर निशाणा साधला. "आमच्यावर विरोधक आरोप करतायेत की, राज्यातील कारखाने परराज्यात चालले आहेत. मात्र, असं काही नाही. बाहेर राज्यातील कारखाने आपल्या राज्यात आणतोय. बंगळुरु येथील 40-40 कोटीचे दोन कारखाने आम्ही छत्रपती संभाजीनगर येथे आणत आहेत," असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी विरोधकांना उत्तर दिलं.

जनसन्मान यात्रेत जनतेशी संवाद साधताना उपमुख्यमंत्री अजित पवार (ETV Bharat Reporter)

आमचं सरकार सर्वधर्मसमभावाचं : उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जनसन्मान यात्रा काल कोपरगाव शहरात आली होती. यावेळी ते म्हणाले की "केंद्राच्या विचाराचे सरकार राज्यात आले पाहिजे. लोकसभेला संविधान बदलणार, आरक्षण काढणार, समान नागरी कायदा आणणार या खोट्या प्रचाराला बळी पडलात. अल्पसंख्याक समाज बाजूला गेला पण आमचं सरकार सर्वधर्मसमभावाचं आहे. काळजी करू नका, विश्वास ठेवा, मनात कसलीही भीती बाळगू नका, भेदभाव नाही. सर्व समाजाला मी वेगवेगळ्या योजनेतून न्याय दिला."

अनेक चांगल्या योजना : "एका जनसेवकासाठी जनता हीच देव आहे. तुम्ही दिलेली शक्ती हीच माझी दैवी शक्ती आहे. तीन दशकांपासून ठामपणे तुम्ही माझ्या पाठीशी उभे आहात. छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरापगड जातींना सोबत घेऊन स्वराज्य उभं केलं. त्या सर्व घटकांचा आवाज ऐकून त्यांचं दु:ख, गरजा लक्षात घेऊन त्याप्रमाणे काम करण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत आहोत. महिला, युवक-युवती, शेतकरी यांच्यासाठी अनेक चांगल्या योजना महायुतीच्या माध्यमातून आणल्या आहेत. जनतेची सेवा करणं हा आमचा धर्म आहे," असं म्हणत अजित पवारांनी योजनांचा पाढाच यावेळी वाचला.

विरोधकांना पंधराशे रुपयांचे महत्त्व कसं कळणार : "विरोधक करत असलेली टीका मी गांभीर्यानं घेत नाही. विरोधकांना पंधराशे रुपयांचं महत्त्व कसं कळणार?" असा प्रश्न अजित पवारांनी विचारला. राज्यातील गरीब महिलांना 'लाडकी बहीण' योजनेतून मिळणारे पंधराशे रुपये खूप मोठी मदत ठरणार असल्याचा दावाही त्यांनी केला. यावेळी विरोधकांचा समाचार घेताना ते म्हणाले, "मी गेली दहा वर्ष अर्थमंत्री आहे. दहा वेळा राज्याचे बजेट सादर केलं. बजेट सादर करणं काय असतं हे विरोधकांना कळणार नाही. ते येड्या गबाळ्याचं काम नव्हे. विरोधक सत्तेत होते तेव्हा त्यांनी जनतेला काय दिलं? काहीही दिलं नाही. अगदी दीड रुपया देखील दिला नाही."

हेही वाचा

  1. लोकसभेच्या निकालानंतर अजित पवारांना लाडकी बहीण आठवली - पृथ्वीराज चव्हाण - Prithviraj Chavan Vs Ajit Pawar
  2. महायुतीचा निवडणुकीसाठी प्लॅन ठरला? सुरू आहेत बैठकांवर बैठका - Maharashtra Assembly Election

ABOUT THE AUTHOR

...view details