महाराष्ट्र

maharashtra

पीक विमा योजनेच्या नावाखाली शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक करण्याचा प्रयत्न केल्यास गय करणार नाही - धनंजय मुंडे - Dhananjay Munde

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 29, 2024, 6:58 PM IST

Dhananjay Munde : एक रुपयात पीक विमा योजनेच्या नावाखाली सीएससी केंद्र चालक किंवा अन्य कोणी शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याची गय केली जाणार नाही, असं स्पष्टीकरण कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी बीडमध्ये दिलं आहे. पीक विमा भरण्यासाठी आगाऊ पैसे मागणाऱ्यांची कृषी हेल्पलाइनच्या व्हाट्सअपवर किंवा स्थानिक तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे तक्रार करावी, असं आवाहनही त्यांनी केलं.

Dhananjay Munde
फाईल फोटो (ETV Bharat Reporter)

बीडDhananjay Munde : प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगामासाठी एक रुपयात पीक विमा भरणं चालू आहे; मात्र राज्यात काही ठिकाणी सीएससी केंद्र चालक हे शेतकऱ्यांकडून एक रुपयाच्यावर अवैधरीत्या काही आगाऊ रकमा वसूल करत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. आगाऊ पैसे वसूल करणाऱ्या केंद्र चालकांची पुराव्यासह तक्रार आल्यास आपण त्यांच्यावर कारवाई करणार. अशा लोकांची अजिबात गय केली जाणार नाही, असा इशारा राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिला आहे.

तर ग्रामविकास विभागाने कारवाई करावी :याबाबत धनंजय मुंडे यांनी शेतकऱ्यांना आगाऊ पैसे मागणाऱ्या सीएससी केंद्र चालकांची शक्य असेल त्या पुराव्यासह राज्य शासनाचा कृषी हेल्पलाइन व्हाट्सअप क्रमांक 9822446655 या क्रमांकावर व्हाट्सअपद्वारे थेट तक्रार करावी किंवा स्थानिक तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे याबाबत तक्रार द्यावी असं आवाहन केलं आहे. सदर केंद्र चालकांवर ग्रामविकास विभागाच्या मदतीनं कडक कारवाई केली जाईल, असा सज्जड दम मुंडे यांनी दिला आहे.

शेतकऱ्यांकडून आगाऊ पैशाची वसुली :शेतकऱ्यांना पीक विम्याचा एक अर्ज भरण्यासाठी एक रुपया इतकीच रक्कम पोर्टलवर भरणे अपेक्षित आहे तर यासाठी संबंधित केंद्र चालकाला शासनाकडून प्रति विमा अर्ज 40 रुपये मानधन दिले जाते; मात्र काही केंद्रचालक सात-बारा ऑनलाइन काढणे, पेरणी प्रमाणपत्र यासारख्या बाबींच्या नावाने शेतकऱ्यांना आगाऊ पैसे मागत असल्याच्या तक्रारी येत आहेत. या विरोधात आता धनंजय मुंडे यांनी अधिक कडक भूमिका घेतल्याचं दिसून येत आहे.

हेही वाचा :

  1. NEET पेपर लिक प्रकरण; चौकशीसाठी सीबीआयचं पथक आज धडकणार लातूरमध्ये - NEET Paper Leak Case
  2. NEET प्रकरणी लातूरातून एप्रिलमध्ये NTA ला पत्र, लातूरच्या दिलीप देशमुखांची माहिती - NEET Paper leak Case
  3. राहुल गांधी पंतप्रधान पदाचा चेहरा असते तर...; काय म्हणाले संजय राऊत? - Sanjay Raut

ABOUT THE AUTHOR

...view details