महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

भारतीय संघ पुण्यात इतिहास रचणार? आतापर्यंत भारतात 'असं' एकदाच झालं

भारत आणि न्यूझीलंड क्रिकेट संघ यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर (MCA) सुरु आहे.

Highest Run Chased by India in Test
भारतीय क्रिकेट संघ (AP Photo)

By ETV Bharat Sports Team

Published : Oct 26, 2024, 11:17 AM IST

पुणे Highest Run Chased by India in Test :भारत आणि न्यूझीलंड क्रिकेट संघ यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर (MCA) सुरु आहे. हा सामना जिंकण्यासाठी भारतीय संघाला 359 धावांचं लक्ष्य मिळालं आहे. अशा परिस्थितीत भारतीय भूमीवर केवळ एकदाच 350 हून अधिक धावांचा पाठलाग करण्यात आला असला तरी भारतीय संघ या लक्ष्याचा पाठलाग करु शकेल का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

भारतीय संघाला करावी लागणार इतिहासाची पुनरावृत्ती : न्यूझीलंडनं पहिल्या डावात 259 धावा केल्या होत्या, त्याला प्रत्युत्तरात भारतीय संघ केवळ 156 धावाच करु शकला. पहिल्या डावाच्या आधारे न्यूझीलंडकडं 103 धावांची आघाडी होती. दुसऱ्या डावात न्यूझीलंडचा संघ 255 धावांत सर्वबाद झाला. एकूणच भारतीय संघाला चौथ्या डावात 350 हून अधिक धावांचं लक्ष्य गाठावं लागणार आहे. चौथ्या डावात इतक्या धावा करणं सोपं नसलं तरी अशक्य मात्र नाही.

भारतानं एकदाच केला 350 पेक्षा जास्त धावांचा पाठलाग : भारतीय भूमीवर केवळ एकदाच कसोटी क्रिकेटमध्ये 350 हून अधिक धावांचं लक्ष्य यशस्वीपणे पार केलं गेलं. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघानं हा इतिहास रचला. डिसेंबर 2008 मध्ये चेन्नईमध्ये भारतानं इंग्लंडविरुद्ध 387 धावांचं लक्ष्य यशस्वीपणे गाठलं होतं. त्या सामन्यात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं शतक (नाबाद 103 धावा) केलं होतं आणि भारतीय संघ हा सामना सहा गडी राखून जिंकण्यात यशस्वी ठरला होता.

सेहवागची आक्रमक खेळी : मात्र, सलामीवीर वीरेंद्र सेहवागनं त्या सामन्यात लक्ष्याचा पाठलाग करताना केवळ 68 चेंडूत 83 धावा केल्या होत्या. ज्यात 11 चौकार आणि चार षटकारांचा समावेश होता. सेहवागच्या त्या वादळी खेळीनं भारतीय संघाला गती दिली होती. युवराज सिंग (नाबाद 85) आणि दुसरा सलामीवीर गौतम गंभीर (66 धावा) यांनीही अर्धशतकी खेळी खेळली. त्या तुफानी खेळीसाठी सेहवागची 'प्लेअर ऑफ द मॅच' म्हणून निवड करण्यात आली होती.

भारतानं गाठलं होतं 406 धावांचं लक्ष्य : तथापि, भारतीय संघानं कसोटी क्रिकेटमधील सर्वात यशस्वी धावांचा पाठलाग 1976 साली केला, जो त्यांनी परदेशी भूमीवर पूर्ण केला. त्यानंतर भारतीय संघानं वेस्ट इंडिजविरुद्धच्या पोर्ट ऑफ स्पेन कसोटीत 406 धावांचं लक्ष्य चार गडी गमावून पूर्ण केलं होतं. भारतीय संघाच्या वतीनं गुंडप्पा विश्वनाथ (112 धावा) आणि सुनील गावस्कर (102 धावा) यांनी चौथ्या डावात शतकी खेळी खेळली होती.

भारतीय संघ पुण्यात 2008 च्या इतिहासाची पुनरावृत्ती करु शकेल का?

आता पुणे कसोटी सामन्यात 2008 च्या इतिहासाची पुनरावृत्ती करण्याचं आव्हान भारतीय संघासमोर आहे. तथापि, हे सोपं काम होणार नाही. मात्र पहिल्या सत्रात भारतीय संघानं न्यूझीलंडला लवकर बाद केलं असून त्यांनी चौथ्या डावात आक्रमक सुरुवातही केली आहे. त्यामुळं विजयाच्या आशा वाढल्या आहेत.

हेही वाचा :

  1. भारतीय संघात स्थान मिळवण्याचं चक्रव्यूह भेदण्यात 'अभिमन्यू' यशस्वी; ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी 'नितीश कुमार'ही भारतीय संघात
  2. पाकिस्तानमुळं 1882 नंतर क्रिकेटला पाहायला मिळालं 'हे' दृश्य; क्रिकेटच्या इतिहासात दुसऱ्यादाच 'असं' घडलं

ABOUT THE AUTHOR

...view details