ब्रिस्बेन First Player to Score 7000 Runs and 300 Wickets : भारतीय महिला क्रिकेट संघ सध्या 3 सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आहे. त्यांचा दुसरा सामना ब्रिस्बेनमध्ये खेळवला जात आहे. ऑस्ट्रेलियन संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यादरम्यान संघाची अनुभवी अष्टपैलू खेळाडू एलिस पेरीनं शानदार शतकी खेळी खेळली. तिनं अवघ्या 74 चेंडूत शतक झळकावलं. पेरीनं केवळ शतकच केले नाही तर एक मोठा विश्वविक्रमही आपल्या नावावर केला. खरं तर, ती आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 7000 धावा आणि 300 बळी घेणारी पहिलीच महिला क्रिकेटपटू ठरली आहे.
90 वर्षांत प्रथमच घडला पराक्रम : महिला क्रिकेटची सुरुवात 1934 मध्ये झाली. त्यानंतर अनेक क्रिकेटपटूंनी खेळून निवृत्ती घेतली आहे. पण 90 वर्षांच्या इतिहासात हा विक्रम कुणालाच करता आला नाही. पेरीनं भारताविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात शतक झळकावलं तेव्हा ती आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 7000 धावा आणि 300 बळी घेणारी पहिली महिला क्रिकेटपटू बनली. या सामन्यापूर्वी तिनं 6975 धावा केल्या होत्या. ब्रिस्बेनमध्ये 25 धावा करताच तिनं हा विश्वविक्रम आपल्या नावावर केला.
कशी आहे कारकिर्द : पेरीनं भारताविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात 75 चेंडूत 105 धावांची तुफानी इनिंग खेळली. यादरम्यान तिनं 7 चौकार आणि 6 षटकार मारले. तिच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत, एलिस पेरीनं 13 कसोटीत 61.86 च्या सरासरीनं 928 धावा करत 39 विकेट घेतल्या आहेत. 149 वनडे सामन्यांमध्ये तिनं 50.11 च्या सरासरीनं 4064 धावांसह 165 बळी घेतले आहेत. याशिवाय तिनं टी20 मध्ये 31.16 च्या सरासरीनं 2088 धावांसह 126 विकेट्स घेतल्या आहेत.
ऑस्ट्रेलियाचा धावांचा डोंगर : या सामन्यात ऑस्ट्रेलियन संघानं भारतीय गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली आणि 50 षटकांच्या सामन्यात 8 गडी गमावून 371 धावा केल्या. यात ॲलिस पेरी आणि जॉर्जिया वॉल यांच्या शतकांचं महत्त्वाचं योगदान होतं. पेरीनं 105 धावा केल्या तर वॉलनं 87 चेंडूत 101 धावांची तुफानी खेळी केली. या दोघांशिवाय बेथ मुनीनं 44 चेंडूत 56 धावा केल्या. भारतासाठी सायमा ठाकोर 10 षटकात 62 धावांत 3 बळी घेत सर्वात यशस्वी गोलंदाज ठरली. याशिवाय मिनू मणीनं 2, प्रिया मिश्रा, रेणुका सिंग आणि दीप्ती शर्मानं प्रत्येकी 1 बळी घेतला.
हेही वाचा :
- कुठुन येते इतकी कन्सिस्टंटन्सी...? 'कीवीं'विरुद्ध शतक झळकावत रुटनं केला महापराक्रम
- ॲडलेडमध्ये पुन्हा फसली टीम इंडिया... 'डे-नाईट' कसोटीत अडीच दिवसांत कांगारुंकडून पराभव