महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / politics

"उद्धव ठाकरे यांच्या हट्टापायी..."; पंतप्रधान मोदींची बोचरी टीका - Narendra Modi On Uddhav Thackeray

राज्यातील विविध प्रकल्पांचं उद्घाटन आणि भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं. ठाण्यात बोलताना मोदींनी विकासकामांवरुन उद्धव ठाकरेंसह महाविकास आघाडीवर टीका केली.

By ETV Bharat Marathi Team

Published : 4 hours ago

Updated : 3 hours ago

PM Narendra Modi  On Uddhav Thackeray
उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (File Photo)

ठाणे/मुंबई :पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईतील आणि ठाण्यातील विविध प्रकल्पांचं भूमिपूजन आणि उद्घाटन केलं. यामध्ये मुंबईतील पहिल्या भूमिगत 'मेट्रो 3' प्रकल्पाचासुद्धा समावेश आहे. याप्रसंगी 'मेट्रो 3' या प्रकल्पावर बोलताना नरेंद्र मोदी यांनी महाविकास आघाडीसह उद्धव ठाकरे यांच्यावर बोचरी टीका केली. सत्तेच्या लालसेपोटी तसंच फक्त मुख्यमंत्रिपदासाठी उद्धव ठाकरे हे काँग्रेसबरोबर गेल्याचं मोदी म्हणाले.

अहंकारापोटी 'मेट्रो तीन'च काम लटकवलं : पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, "लटकना, अटकना, भटकना एवढच महाविकास आघाडीला येतं. मेट्रो 3 ची सुरुवात ही तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कारकिर्दीत झाली होती. त्याचं 60 टक्के काम हे त्यांच्या कार्यकाळात पूर्ण झालं होतं. परंतु त्यानंतर महाविकास आघाडीचं सरकार आलं. महाविकास आघाडीनं आपल्या अहंकारापोटी 'मेट्रो तीन'चं काम लटकवलं. अडीच वर्षे हे काम लटकल्यानं याची किंमत 14 हजार कोटीनं वाढली. हे 14 हजार कोटी महाराष्ट्राचे नव्हते का?, हा पैसा महाराष्ट्राच्या नागरिकांचा नव्हता का? तर हा महाराष्ट्रातील आयकर देणाऱ्या जनतेचा पैसा होता."

सभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी (ANI)

महाराष्ट्राच्या दुश्मनांना सत्तेपासून दूर ठेवा :"एकीकडं कामाला प्राधान्य देणारं महायुतीचं सरकार आणि दुसरीकडं विकासाला रोखण्याचं काम करणारे हे महाविकास आघाडीचं सरकार होतं. महाविकास आघाडी सरकारनं त्यांच्या कामानं सिद्ध केलं की, ती 'महाविकास विरोधी' लोक आहेत. त्यांनी अटल सेतूचा विरोध केला, मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनला विरोध केला. त्यांनी दुष्काळग्रस्त भागात जल योजनासुद्धा करू दिली नाही. महाविकास आघाडीनं विकासाची सर्व कामं रोखून धरली होती. महाराष्ट्रातील विकासाच्या या दुश्मनांना आपण सत्तेपासून शेकडो मैल दूर ठेवायचं आहे," असं आव्हान पंतप्रधान मोदी यांनी जनतेला केलं.

राहुल गांधी यांच्यावर केली टीका :याप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावरही सडकुन टीका केली. ते म्हणाले की, "काँग्रेस भारतातील सर्वात बेईमान आणि भ्रष्ट पार्टी आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये काँग्रेसचं चरित्र बदलत नाही. काँग्रेसच्या एका मुख्यमंत्र्यांचे जमीन घोटाळ्यामध्ये नाव आले आहे. त्यांचे मंत्री महिलांना शिव्या देत आहेत. काँग्रेस निवडणुकीत मोठ-मोठ्या घोषणा करत आहे. परंतु सरकार स्थापन झाल्यावर काँग्रेसवाले जनतेचं शोषण करण्यासाठी नव-नवीन कल्पना शोधतात. निरनिराळे टॅक्स लावून आपल्या घोटाळ्यांसाठी पैसा जमा करणं हा त्यांचा अजेंडा आहे."

काँग्रेसला योजना बंद करायच्या आहेत :"हिमाचलमध्ये काँग्रेसनं हद्दच केली. तिथे त्यांनी एक नवीन टॅक्स लावला आहे. तो म्हणजे 'टॉयलेट टॅक्स'. एकीकडं मोदी सरकार म्हणत आहे की, टॉयलेट बांधा आणि यांनी लुटमार सुरू केली. लुटमार, खोटं बोलणं आणि कुशासन हे काँग्रेसचं परिपूर्ण पॅकेज आहे. महाराष्ट्रात यांनी आतापासून आपला रंग दाखवायला सुरुवात केली. महायुती सरकारनं महाराष्ट्राच्या महिलांसाठी 'लाडकी बहीण योजना' सुरू केली. महिलांना दीड हजार महिना आणि वर्षाला तीन मोफत गॅस सिलेंडर भेटत आहेत. परंतु, ही बाब महाविकास आघाडीला पचत नाही. ते संधीची वाट बघत आहेत की, आम्हाला कधी संधी भेटते आणि एकनाथ शिंदे यांनी आणलेल्या सर्व योजना आम्ही बंद करू. त्यांना हा पैसा महिलांच्या खिशात नाही तर यांच्या दलालांच्या खिशात जायला हवा," असं म्हणत मोदींनी महाविकास आघाडीसह काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला.

'काँग्रेस अर्बन नक्सल गँग' चालवत आहे : "काँग्रेस 'अर्बन नक्सल गँग' चालवत आहे. काँग्रेस सरकार बनवण्याचं स्वप्न बघत आहे. काँग्रेसचं एकच मिशन आहे, समाजामध्ये भेदभाव करून सत्ता काबीज करायची. परंतु आपणाला आपल्यातील एकतेलाच देशाची ढाल बनवायचं आहे. आपणाला त्यांचे मनसुबे यशस्वी करायचे नाहीत. काँग्रेसने महाराष्ट्राला धुळीस मिळवलं. यांच्या संगतीत येऊन इतर पक्षही बरबाद झाले. यांचे राजकारण तुष्टीकरणाचं असल्याकारणानं हे वक्फ बोर्ड बिलाला विरोध करत आहेत. भाजपाने देशाचा विकास केला. आम्हाला देशाला अजून पुढे घेऊन जायचं आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिक आमच्या संकल्पनासोबत, 'एनडीए'सोबत आहे. या विश्वासाने मी तुम्हा सर्वांना विकासाच्या कामासाठी खूप खूप शुभेच्छा देतो," असं मोदी म्हणाले.

हेही वाचा -

  1. महायुतीत पडणार खिंडार! अमरावती मतदार संघावर भाजपाचा दावा - Maharashtra Assembly Election 2024
  2. पंतप्रधान मोदींकडून नंगारा भवनाचं उद्घाटन, बंजारा समाजाच्या 'काशी'त वाजवले नगारे - PM NARENDRA MODI SPEECH IN WASHIM
  3. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर, विविध विकास कामांचं करणार उद्घाटन, 'असा' असेल संपूर्ण दौरा - PM Modi Maharashtra Visit
Last Updated : 3 hours ago

ABOUT THE AUTHOR

...view details