नवी दिल्ली Students Died In Coaching Centre : दिल्ली इथल्या राजेंद्र नगर परिसरातील कोचिंग सेंट्रमधील वाचनालयात पाणी भरल्यानं तब्बल तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे देशभरात मोठी खळबळ उडाली आहे. आता आणखी एका कोचिंग सेंटरच्या विद्यार्थ्यांनी मोठं आंदोलन उभं केलं आहे. आम्हाला न्याय द्या, अशी घोषणाबाजी करत विद्यार्थ्यांनी मुखर्जी नगरमधील कोचिंग सेंटरच्या विरोधात घोषणाबाजी सुरू केली. दुसरीकडं तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्यानंतर केंद्रीय लोकसेवा आयोगासाठी कार्यरत असलेल्या कोचिंग सेंटरच्या मालकांमध्येही मोठी दहशत निर्माण झाली आहे. दृष्टी आयएएस कोचिंग सेंटरचे संटचालक डॉ विकास दिव्यकिर्ती यांनी आपण यापुढं फक्त परवानगी असलेल्या इमारतीमध्येच कोचिंग सेंटर चालवणार असल्याचं त्यांनी वृत्तसंस्थेला बोलताना स्पष्ट केलं.
मुखर्जी नगर कोचिंग सेंटरच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन :दिल्लीतील कोचिंग सेंटरच्या वाचनालयात पाणी भरुन तीन विद्यार्थ्यांचा बळी गेल्यानं विद्यार्थ्यांचा मोठा आक्रोश होत असल्याचं दिसून येत आहे. दिल्लीत मुखर्जी नगर इथल्या विद्यार्थ्यांनी कोचिंग सेंटरच्या विरोधात आंदोलन सुरू केलं आहे. या आंदोलक विद्यार्थ्यांनी कोचिंग सेंटरच्या विरोधात मोठी घोषणाबाजी केली. यावेळी विद्यार्थ्यांनी कोचिंग सेंटरच्या पुढं ठिय्या मांडत मोठा गदारोळ केला. कोचिंग सेंटरच्या वतीनं लाखो रुपयाचं शुल्क वसूल करुन विद्यार्थ्यांना सुरक्षा देण्यात येत नसल्यावरुन या विद्यार्थ्यांनी कोचिंग सेंटर मालकाविरोधात मोर्चा उघडला आहे.
काय म्हणाले डॉ विकास दिव्यकिर्ती :राजेंद्र नगर इथल्या कोचिंग सेंटरच्या तळघरातील वाचनालयात पाणी भरल्यानं तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्यानंतर चांगलंच वातावरण तापलं आहे. मुखर्जीनगरमधील विद्यार्थ्यांनी कोचिंग सेंटरच्या मालकाविरोधात जोरदार आंदोलन सुरू केलं आहे. लाखो रुपयाचं शुल्क वसूल करुनही विद्यार्थ्यांना सुरक्षा पुरवण्यात येत नाही, त्यामुळे विद्यार्थी आक्रमक झाले. दुसरीकडं दृष्टी आयएएसचे संचालक डॉ विकास दिव्यकिर्ती यांनी, "दिल्लीत परवानगी नसलेली कोणतीही इमारत आम्ही कोचिंग सेंटरसाठी घेणार नाही. यापुढं केवळ मंजूर इमारतीमध्येच आम्ही काम करू. राजेंद्र नगर विद्यार्थी मृत्यू प्रकरणात निष्काळजीपणा झाल्याचं स्पष्ट दिसत आहे. मात्र असा निष्काळजीपणा कधीच आमच्याकडून होणार नाही. भविष्यात आम्ही कधीच तळघरात कोचिंग सेंटरचं काम करणार नाही. अग्निशामक मार्ग नसलेल्या इमारतीत आम्ही काम करत नाही. तसंच विद्यार्थ्यांच्या जीवाशी तडजोड कधीच होणार नाही, हा आमचा हेतू आहे. माझ्याकडून मोठी चूक झाली आहे. त्यामुळे मी सगळ्या देशाची आणि समाजाची माफी मागतो. भविष्यात अशी चूक कधीच होणार नाही."