महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

शेतकऱ्यांचा पुन्हा एकदा 'दिल्ली चलो'चा एल्गार; पोलिसांकडून रस्त्यावर खिळे आणि काँक्रीटची भिंत बनवून मल्टी लेयर बॅरिकेडिंग - FARMERS DELHI MARCH

पंजाबचे शेतकरी आज (8 डिसेंबर) पुन्हा एकदा दिल्लीकडं कूच करणार आहेत. त्यांना रोखण्यासाठी हरियाणा पोलिसांनी बहुस्तरीय बॅरिकेड लावल्याचं पहायला मिळतंय.

farmers delhi march update ambala shambhu border farmers protest sarwan singh pandher
पंजाबचे शेतकरी दिल्लीकडे कूच करणार (ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 8, 2024, 9:55 AM IST

चंदीगड/अंबाला : हरियाणा आणि पंजाबच्या शंभू सीमेवर आंदोलन करणारे शेतकरी आज (8 डिसेंबर) पुन्हा एकदा दिल्लीकडं कूच करणार आहेत. शेतकरी नेते सर्वन सिंह पंढेर म्हणाले की, "6 डिसेंबरलाही आम्ही दिल्लीकडं मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, पोलिसांनी आम्हाला पुढं जाऊ दिलं नाही." यावेळी शेतकऱ्यांची पोलिसांशी झटापट झाली. यात 16 शेतकरी जखमी झाले आहेत. किरकोळ जखमी झालेल्या शेतकऱ्यांसह 25 पेक्षा जास्त शेतकरी जखमी झाले आहेत.

शेतकरी पुन्हा दिल्लीकडं कूच करणार : शेतकरी नेत्यानं सांगितले की, "जखमी झालेल्या एका शेतकऱ्याची श्रवणशक्ती कमी झाली आहे. पोलीस-प्रशासनात कोणताही संघर्ष आम्हाला नको आहे, असं ते म्हणाले. त्यामुळं आम्ही 6 डिसेंबरचा दिल्लीचा मोर्चा स्थगित करून सरकारला चर्चेसाठी वेळ दिला होता. मात्र, सरकारनं चर्चेचा कोणताही प्रस्ताव दिला नाही. त्यानंतर 8 डिसेंबरला म्हणजेच आज दुपारी 12 वाजता 101 शेतकरी दिल्लीला रवाना होणार आहेत".

रस्त्यावर खिळे आणि काँक्रीटची भिंत बनवून मल्टी लेयर बॅरिकेडिंग (ETV Bharat)

काय म्हणाले सर्वन सिंह पंढेर? : शंभू सीमेवर शेतकरी नेते सर्वन सिंह पंढेर म्हणाले, "किसान मजदूर मोर्चा आणि संयुक्त किसान मोर्चाचे आंदोलन 300 व्या दिवसात पोहोचलं आहे. मात्र, केंद्र सरकार अजूनही आपल्या भूमिकेवर ठाम आहे. आम्ही आणखी एक मोठी घोषणा केली की, आम्ही पंजाबमध्ये भाजपाला विरोध करणार आहोत. मात्र, हरियाणाचे मुख्यमंत्री नायबसिंह सैनी आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी अमृतसरला जात असल्याचं आम्ही ऐकलंय. आम्ही पंजाबमधील शेतकऱ्यांना त्यांच्या राज्यात प्रवेश करण्यास विरोध करण्याचं आवाहन करतो.”

पंजाबच्या शेतकऱ्यांचं शंभू सीमेवर 300 दिवसांपासून आंदोलन सुरूच आहे. (ETV Bharat)
  • शेतकऱ्यांना रोखण्यासाठी सुरक्षा व्यवस्था कडक : हरियाणा पंजाब आणि हरियाणा दिल्ली सीमेवर सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना पुढं जाण्यापासून रोखण्याकरिता बॅरिकेड लावण्यात आलं आहे.

दातासिंहवाला सीमेवरही सुरक्षा कडक : जींद आणि पंजाबच्या दातासिंहवाला सीमेवरही सुरक्षा कडक करण्यात आली आहे. दातासिंह सीमा सध्या सील करण्यात आली असून शेतकऱ्यांचा दिल्लीकडं मोर्चा पाहता फौजफाटा वाढवण्यात आलाय. याशिवाय उढाणा आणि नरवाना कालव्यातील ब्लॉक काढण्यात आलेत. तर उझाना आणि नरवाना सिरसा शाखा कालव्यावर नाकाबंदी करण्यात आली आहे.

शेतकऱ्यांना रोखण्यासाठी बहुस्तरीय बॅरिकेडिंग करण्यात आलंय. (ETV Bharat)

पोलीस आणि शेतकऱ्यांमध्ये चकमक : 6 डिसेंबरला दिल्लीकडं निघालेल्या मोर्चादरम्यान शेतकऱ्यांनी प्रथम बॅरिकेड्स उखडून टाकले. यानंतर काटेरी तारा उपटून सिमेंटमध्ये टाकलेले खिळे काढण्यात आले. यानंतर पोलिसांनी शेतकऱ्यांना रोखण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. काही शेतकऱ्यांनी पोलीस अधिकारी गाठले. त्यांना रोखण्यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांनी मिरपूड स्प्रेचा वापर केला. त्यानंतर शेतकरी मागे हटले. या घटनेत अनेक शेतकरी जखमी झाले.

काय आहेत शेतकरी संघटनांच्या मागण्या? : सर्व पिकांच्या खरेदीवर एमएसपीवर हमीभाव देण्यासाठी कायदा करण्यात यावा, डॉ.स्वामिनाथन आयोगाच्या अहवालानुसार पिकाची किंमत निश्चित करण्यात यावी, डीएपी खताची कमतरता दूर करावी, शेतकरी आणि शेतमजुरांचे कर्ज माफ करून पेन्शन देण्यात यावी, भूसंपादन कायदा 2013 पुन्हा लागू करावा, तसंच लखीमपूर खेरी घटनेतील दोषींना शिक्षा झाली पाहिजे, मुक्त व्यापार करारांवर बंदी घालावी, अशा शेतकरी संघटनांच्या मागण्या आहेत.

शेतकऱ्यांच्या यादेखील आहेत मागण्या

  • शेतकरी आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना भरपाई आणि सरकारी नोकरी मिळावी.
  • वीज दुरुस्ती विधेयक 2020 रद्द करण्यात यावं.
  • मनरेगा अंतर्गत दरवर्षी 200 दिवसांचं काम आणि 700 रुपये प्रतिदिन देण्यात यावं.
  • बनावट बियाणे, कीटकनाशके आणि खते विकणाऱ्या कंपन्यांवर कडक कायदा करण्यात यावा.
  • मिरची, हळद आणि इतर मसाल्यांसाठी राष्ट्रीय आयोगाची स्थापना करावी.
  • संविधानाच्या अनुसूची 5 ची अंमलबजावणी करून आदिवासींच्या जमिनींची लूट थांबवावी

हेही वाचा -

  1. शेतकरी आंदोलनाचा 27वा दिवस: आंदोलक रेल्वेनं दिल्लीला पोहोचण्याची शक्यता, पंजाबमध्ये 'रेल रोको'ची हाक
  2. शेतकरी आंदोलनाची आज ठरणार रणनीती, शंभू-खनौरी सीमेवर ट्रॅक्टरच्या संख्येत वाढ
  3. शेतकरी आंदोलन आणखी एका शेतकऱ्याचा मृत्यू, पंजाबच्या सीमेवर तणावाची स्थिती

ABOUT THE AUTHOR

...view details