मुंबई - येत्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडी यांच्याकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे. दोन्ही बाजूंकडून एक-दोन दिवसांत जागावाटपाचा तिढा सुटण्याची शक्यता आहे, असंही सांगण्यात येतंय. खरं तर मागील काही दिवसांपासून महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्रिपदाचा चेहरा घोषित करा, अशी आग्रही मागणी शिवसेना (ठाकरे गटाचे) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली होती. त्यासाठी त्यांनी दिल्लीला जाऊन सोनिया गांधींची भेटही घेतली होती. परंतु याला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) यांच्याकडून म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. तसेच आमच्यासाठी तो विषय संपला असल्याचं सांगत शरद पवारांनी मुख्यमंत्रिपदाबद्दल बोलण्यासही नकार दिलाय. परंतु तरीही वारंवार ठाकरे गटाचे नेते मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून उद्धव ठाकरेंना जाहीर करा, अशी मागणी करत आहेत. याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीमधून कोण मुख्यमंत्री होणार, यावर शिवसेना (ठाकरे गटाचे) आमदार अनिल परब यांनी एक मोठं वक्तव्य केलंय.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच : एका कार्यक्रमात बोलताना आमदार अनिल परब म्हणाले की, विधानसभा निवडणुकीत ज्या ज्या मतदारसंघात उद्धव ठाकरेंना मानणारा मतदार आहे. तिथे महाविकास आघाडीचाच उमेदवार विजयी होईल. तसेच मी आज तुम्हाला सांगतो की, निवडणुकीत महाविकास आघाडीच जिंकणार आहे आणि महाविकास आघाडीचीच सत्ता येणार आहे. महाविकास आघाडीमधून उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री होतील, असं मोठं वक्तव्य आमदार अनिल परब यांनी केलंय. मात्र दुसरीकडे महाविकास आघाडीमधील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस मुख्यमंत्रिपदावरून मौन बाळगून असताना त्यांच्याच सहकारी मित्र पक्षाने "मुख्यमंत्री हा आमच्याच पक्षाचा असेल..." असं म्हटल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) आणि काँग्रेस या दोन पक्षाकडून कोणती प्रतिक्रिया येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
वरुण सरदेसाईच जिंकणार : शिवसेना (ठाकरे गट) उमेदवार आणि युवासेना सचिव वरुण सरदेसाई हे वांद्रे मतदारसंघातून निवडणूक लढणार असून, वरुण सरदेसाई हेच जिंकून येतील, असा विश्वास अनिल परब यांनी व्यक्त केलाय. मुंबईतील काही मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीत एकमत होत नाही. मुंबईत एकूण 36 विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यातील काही जागांवर महाविकास आघाडीत अद्यापपर्यंत एकमत झालेलं नाही. परंतु वांद्रे, अणुशक्ती नगर, विक्रोळी आदी मतदारसंघांतील महाविकास आघाडीमध्ये जागांचा तिढा कायम आहे. मात्र वांद्रे मतदारसंघातील उमेदवारी अनिल परब यांनी वरुण सरदेसाई यांच्या रुपाने जाहीर केल्यामुळं महाविकास आघाडीतील नेत्यांनी नाराजी व्यक्त केलीय.
हेही वाचा :