मुंबई- गेल्या काही दिवसांपासून सीमावर्ती भागातून भारतात घुसखोरीत मोठ्या प्रमाणात वाढ झालीय. त्याच पार्श्वभूमीवर बांगलादेश आणि म्यानमारमधून अवैध रीतीने मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात येणाऱ्या घुसखोरांविरोधात त्वरित योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश केंद्रीय गृह मंत्रालयाकडून महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव, पोलीस महासंचालक आणि अन्य संबंधित यंत्रणांना देण्यात आलेत. शिवसेना उपनेते आणि माजी खासदार राहुल रमेश शेवाळे यांनी बांगलादेशी घुसखोरांविरोधात कठोर कारवाई करण्याबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांकडे केलेल्या मागणीची दखल घेत केंद्रीय गृह मंत्रालयानं वरील निर्देश दिलेत. अभिनेता सैफ अली खानवर बांगलादेशी घुसखोरांकडून झालेल्या हल्ल्याची घटना ताजी असतानाच केंद्रीय गृह मंत्रालयाच्या या आदेशाने घुसखोरांच्या विरोधातील कारवाईला वेग येण्याची शक्यता आहे.
घुसखोरांची संख्या झपाट्याने वाढतेय : माजी खासदार राहुल शेवाळे यांनी 28 नोव्हेंबर 2024 रोजी गृहमंत्री अमित शाह यांना लिहिलेल्या निवेदनात टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस ( TISS ) या संस्थेकडून घुसखोरांविषयी केलेल्या सर्वेक्षणाचा उल्लेख केला होता. राहुल शेवाळे यांनी आपल्या पत्रात लिहिले आहे की, TISS ने केलेल्या सर्वेक्षणानुसार, मुंबईत बांगलादेशी आणि म्यानमारमधून आलेल्या घुसखोरांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यामुळे अनेक ठिकाणी कायदा सुव्यवस्था बिघडली असून, गंभीर सामाजिक आणि आर्थिक समस्या उद्भवल्या आहेत. काही राजकारण्यांकडून अशा घुसखोरांचे 'वोट बँक' म्हणून लांगूलचालन सुरू आहे. बेकायदेशीरपणे भारतात आलेल्या या लोकांमुळे स्थानिकांच्या रोजगारावरही परिणाम होताना दिसत आहे.
अवैध सामाजिक संस्थांकडून घुसखोरांना रसद : आपल्या पत्रात राहुल शेवाळे यांनी घुसखोरांमुळे होणाऱ्या गंभीर समस्यांकडे लक्ष वेधलंय. '1961 च्या जनगणनेनुसार मुंबईत हिंदूंची लोकसंख्या ही 88 टक्के होती. 2011 च्या जनगणनेत हिंदूंची लोकसंख्या 66 टक्क्यांपर्यंत घसरली. हीच टक्केवारी 2051 पर्यंत 54 टक्क्यांवर पोहोचेल, अशी भीती राहुल शेवाळे यांनी आपल्या पत्रात व्यक्त केलीय. तसेच काही नोंदणीकृत नसलेल्या अवैध सामाजिक संस्था या घुसखोरांना रसद पुरवत असल्याचा थेट आरोपदेखील राहुल शेवाळे यांनी केलाय. अशा प्रकारच्या बेकायदेशीर सामाजिक संस्थांवरदेखील कारवाई करण्याची मागणी शेवाळे यांनी केलीय.
हेही वाचा :