जळगाव Premarital counseling : लग्न झाल्यानंतर थोड्या थोड्या गोष्टीतून भांडणे होऊन त्याचे रूपांतर घटस्फोटात होते. घटस्फोट होणे दोघांसाठीही क्लेशदायक असते. हे टाळण्यासाठी लग्नपूर्व समुपदेशन होणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे असे समुपदेशन कक्ष जिल्हा स्तरावर होण्यासाठी आपले शासनस्तरावर प्रयत्न सुरू असल्याची माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी दिली. जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांची आढावा बैठक जिल्हा नियोजन भवनच्या बैठक कक्षात आयोजित केली होती. त्यावेळी त्या बोलत होत्या. या बैठकीला जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, महापालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे, निवासी उपजिल्हाधिकारी गजेंद्र पाटोळे, जिल्हा महिला व बाल कल्याण अधिकारी वनिता सोनगत, विविध विभागाचे प्रमुख उपस्थित होते.
![रुपाली चाकणकर आणि इतर](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/18-09-2024/mh-18-jalgaon-rupalichaknkar-mh10082_18092024132620_1809f_1726646180_69.jpg)
बालविवाह, विधवा प्रथा बंद करण्यासाठी प्रयत्नाची गरज - आजही बालविवाह सारख्या प्रथा दुर्देवानं सुरू आहेत. प्रत्येक जिल्ह्यात मोठे प्रयत्न करूनही असे विवाह होत आहेत. बालविवाह करणे कायद्याने गुन्हा आहे हे माहिती आहे. पण बालविवाह का करू नये, याची माहिती अधिक व्यापक प्रमाणात होणे गरजेचे आहे. तसेच महिला विधवा झाली की तिच्यावर अनेक सामाजिक बंधने लादली जातात. ती बंद व्हावीत, तिच्यात आत्मविश्वास निर्माण करून तिच्या मुलांना वाढविण्यासाठी तिला स्वतःच्या पायावर उभं करण्याचे प्रयत्न व्हायला हवेत. यासाठी समाज शिक्षणाची मोठी गरज आहे. प्रत्येक गावामध्ये या दोन्ही गोष्टीसाठी ग्रामसभेत ठराव होणे गरजेचे आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाकडून प्रयत्न व्हावेत अशी अपेक्षा चाकणकर यांनी व्यक्त केली.
![रुपाली चाकणकर आणि इतर](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/18-09-2024/mh-18-jalgaon-rupalichaknkar-mh10082_18092024132620_1809f_1726646180_336.jpg)
स्त्री भ्रूण हत्या रोखण्यासाठी मिशन मोडवर काम व्हावे - स्त्री आणि पुरुष यांच्या जन्माचे प्रमाण असमान असण्यामागे स्त्री लिंगाची गर्भातच हत्या करण्याचे अत्यंत दुर्देवी प्रकार होत आहेत. यासाठी पीसीएनडीटी हा अत्यंत कडक कायदा असून चोरून असे प्रकार होतात. त्यावर निर्बंध आणण्यासाठी लोकचळवळ होणे गरजेचे आहे. शासनाने स्त्रियांच्या सक्षमीकरणासाठी आता विविध योजना सुरू केल्या आहेत. त्यातून त्यांच्यात आत्मविश्वास येतो आहे. त्यासाठी या योजना लोकांपर्यंत जाण्यासाठी जागृती करणे गरजेचे आहे. असे कायदा विरोधी कृत्य करणाऱ्यांविरुद्ध प्रत्येक जिल्ह्यात कडक कारवाई होण्याची गरज असल्याचे प्रतिपादन रुपाली चाकणकर यांनी केले.
![रुपाली चाकणकर आणि इतर](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/18-09-2024/mh-18-jalgaon-rupalichaknkar-mh10082_18092024132620_1809f_1726646180_349.jpg)
मुख्यमंत्री योजनादूता मार्फत योजना पोहचवू घरोघरी - माहिती व जनसंपर्क महासंचालनालया मार्फत शासनाकडून प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर, शहरात प्रभाग स्तरावर मुख्यमंत्री योजनादूत नेमले जात आहेत. त्यांच्या माध्यमातून घरोघरी शासनाच्या विविध योजना, कायदे यांची माहिती दिली जाणार आहे. त्यात आम्ही महिलांच्या सक्षमीकरणासाठी, त्यांच्या सुरक्षिततेसाठी शासनाने विविध योजना, कायदे केले आहेत. ते या योजनादूतांना योग्य ते प्रशिक्षण देऊन प्रत्येक घरापर्यंत पोहचविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या निदर्शनास आणून दिले. यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी विविध विभागाचे सादरीकरण केले. त्या त्या विभागाच्या प्रमुखांनी त्याचे सविस्तर विवेचन केले.
हेही वाचा...
- Nashik Bharosa Cell : पती-पत्नीच्या कोमेजलेल्या संसारवेलीवर 'भरोसा सेल'नं फुलवला नवा बहर, 87 जणींचा संसार नव्यानं सुरू
- Counselling In love : 'प्रेमातील वाढते हल्ले रोखण्यासाठी समुपदेशन ही काळाची गरज'
- IIT Mumbai News : धक्कादायक! आयआयटी मुंबईसह इतर विद्यापीठांमध्ये विद्यार्थी समुपदेशन केंद्र केवळ नावापुरते!