पुणे - संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत २७ वर्षानंतर भारतीय जनता पक्षाला बहुमत मिळताना पाहायला मिळत आहे. दिल्लीच्या या निकालाबाबत विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांना विचारलं असता ते म्हणाले की, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा दिल्लीचं तख्त काबीज केलेले निकाल आपल्याला पाहायला मिळत आहेत. २७ वर्षानंतर दिल्लीत भाजपाचं आगमन होताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे सगळ्यांना आनंद होत आहे. याआधी संपूर्ण देशात भाजपा जिंकत असताना दिल्लीत पराभूत होत होता. हे शल्य भाजपाच्या कार्यकर्त्यांच्या मनात होतं पण अतिशय चांगल्या पद्धतीनं संघटन मजबूत करत लोकांच्या हिताचा जाहीरनामा प्रसिद्ध केला आणि लोकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास ठेवला, असं राम शिंदे म्हणाले.
विधान परिषदेचे सभापती राम शिंदे आज पुणे दौऱ्यावर होते. यावेळी त्यांना दिल्लीत लागलेल्या निकालाबाबत विचारलं असता त्यांनी आपलं मत व्यक्त केलं. 27 वर्षानंतर भाजपाला मिळालेल्या यशाचं श्रेय कोणाला याबाबत राम शिंदे यांना विचारलं असता ते म्हणाले की, हे श्रेय भारतीय जनता पक्ष तसंच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष यांचं असल्याचं यावेळी ते म्हणाले.
यावेळी राम शिंदे यांना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्राच्या मतदारांच्या संदर्भात उपस्थित केलेल्या प्रश्नाबाबत विचारलं असता ते म्हणाले की, काँग्रेसकडून रडीचा डाव सुरू असून निवडणूक हरले की ईव्हीएमला दोष देण्यात येतो आणि जिंकले की ईव्हीएम चांगलं असतं. कर्नाटक जिंकलं तेव्हा ईव्हीएम खूप चांगलं होतं. तसंच कोणाला तरी बदनाम करायचं, कोणावर तरी खापर फोडायची ही काँग्रेसची रणनीती असून यात आता राहुल गांधी यांनी देखील उडी मारली आहे. आता देखील दिल्लीच्या निवडणुकीत आपल्याला भाजपा जिंकत असताना विरोधकांकडून रडीचा डाव सुरू होणार असल्याचं यावेळी राम शिंदे म्हणाले.
हेही वाचा...
- दिल्ली विधानसभा निवडणुकीत आपला मोठा धक्का, मनीष सिसोदिया यांच्यासह अरविंद केजरीवाल यांचा पराभव
- "...तर संजय राऊत यांनी पत्रकार परिषद न घेता साधना करावी", चंद्रकांत पाटील यांचा राऊतांना टोला
- तब्बल २७ वर्षानंतर दिल्लीत भाजपा दिल्लीच्या सत्तेवर येण्याची शक्यता, कल पाहून भाजप नेत्यांची तयारीसाठी पक्ष कार्यालयात बैठक