मुंबई: लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर महागाई कमी होईल, याकडे सामान्य जनता आस लावून बसली होती. मात्र महागाई कमी होण्याऐवजी महागाईचा भडका उडताना दिसत आहे. गाव-खेड्यात, ग्रामीण भागात जीवनवाहिनी म्हणून एसटीकडे पाहिले जाते. मात्र मागील आठवड्यापासून राज्य परिवहन महामंडळाची लालपरी अर्थात एसटीची भाडेवाढ झाली होती. 14.95 टक्के भाडेवाढ करण्यात आली होती. त्यामुळं एसटी भाडेवाढीमुळं सामान्य माणसांच्या खिशाला कात्री बसली असताना आणि महागाईची झळ बसत असताना आता एसटी, रिक्षा आणि टॅक्सीच्या भाडेवाढीनंतर शाळेच्या बसचाही प्रवास महागणार आहे. खरं तर शाळेच्या बसची भाडेवाढ शैक्षणिक वर्षापासून लागू करण्यात येणार आहे.
भाडेवाढ किती टक्के? : दरम्यान, शाळेच्या बसची भाडेवाढ अनेक कारणामुळं करण्यात येत असल्याचं सांगण्यात येतंय. पेट्रोल डिझेलचे वाढलेले भाव, शाळा बसच्या उत्पादकांककडून बस आणि सुट्या पार्टच्या किमतीत झालेली वाढ, बसचा मेंटेनन्स खर्च, चालक, वाहक आणि महिला मदतनीस यांची पगारवाढ ही महत्त्वाची कारणं आहेत. याव्यतिरिक्त पार्किंगच्या शुल्कात झालेली वाढ, आरटीओचा दंड आदी बाबींचा विचार करून शाळेच्या बसची भाडेवाढ करण्यात आलीय. त्यामुळं शाळेच्या बसची भाडेवाढ 18 टक्क्यांनी होणार आहे, अशी माहिती स्कूल बस ऑपरेटर्स असोसिएशनचे अध्यक्ष अनिल गर्ग यांनी दिली आहे.
आणखी एका महागाईचा फटका : दुसरीकडे शाळेच्या बसची भाडेवाढ शैक्षणिक वर्ष 2025 पासून लागू करण्यात येणार असल्याचं अनिल गर्ग यांनी सांगितलंय. दरम्यान, आधीच एसटी 14.95 टक्के भाडेवाढ, रिक्षा, टॅक्सी प्रवासात झालेली भाडेवाढ त्यानंतर आता शाळेच्या बसची 18 टक्क्यांनी भाडेवाढ होणार आहे. त्यामुळं महागाईने आधीच पिचलेल्या सामान्य माणसासाठी ही शाळेच्या बसची भाडेवाढ म्हणजे आणखी एक महागाईचा फटका असून, सर्वसामान्य प्रवाशांच्या खिशाला कात्री लागणार आहे, असं बोललं जात आहे. शालेय बस संघटनेने भाडेवाढ केल्यामुळं पालकांना अधिकचा आर्थिक भार सहन करावा लागणार असल्यानं पालक वर्गातून नाराजी व्यक्त केली जातेय.
हेही वाचा :