पालघर National Level Archery Competition : हरिद्वार इथं नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय तिरंदाजी स्पर्धेत (नॅशनल आर्चरी चॅम्पियनशिप) सहभागी होण्यासाठी देशभरातील वेगवेगळ्या राज्यातून तिरंदाज आले होते. या स्पर्धत दहा वर्षाखालील वयोगटात वसई येथील मयंक रमाकांत शिंदे यानंदेखील भाग घेतला. इलिमिनेशन राउंडमध्ये मयंकनं महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करताना सर्व कौशल्य पणाला लावलं. या प्रतिष्ठेच्या तिरंदाजी स्पर्धेत त्यानं कांस्यपदकाला गवसणी घातली.
राज्यात अगोदरच सुवर्णपदकांवर कोरलं नाव : या स्पर्धेची तयारी करताना त्याला तिरंदाजीचे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक गौरव पाटील आणि ‘पालघर जिल्हा आर्चरी असोसिएशन’चे अध्यक्ष विनय सावे यांचं मार्गदर्शन लाभलं. या अगोदर मयंकनं महाड इथं झालेल्या राज्यस्तरीय तिरंदाजी स्पर्धेत कास्यपदक मिळवलं होतं. डेरवण (चिपळूण) इथं झालेल्या स्पर्धेत सुवर्णपदक, तर पनवेलला झालेल्या स्पर्धेत रौप्यपदक मिळवलं होतं. तसंच जिल्हास्तरीय स्पर्धेतही त्यानं सुवर्णपदक पटकावलं होतं. आता राष्ट्रीय स्तरावर कांस्यपदक मिळवल्यानं भविष्यात देशासाठी आंतरराष्ट्रीय पदक मिळवून देण्याचं त्याचं स्वप्न आहे.
- दुर्दम्य इच्छाशक्तीपुढं गडही झुकला : अलिकडची मुलं समाजमाध्यमांच्या आहारी गेली आहेत. ती मैदानी खेळ विसरली असून मोबाईल त्यांना अतिशय प्रिय झालाय. अशावेळी आदिवासी भागातील मयंकनं पालघरमधील सर्वांत उंचावरचा गंभीर गड सर करून दुर्दम्य इच्छाशक्तीपुढं शिखरालाही झुकायला लावलं.
गिरीभ्रमणाचा लागला लळा : मयंकचे वडील रमाकांत हे ग्रामविकास अधिकारी आहेत. आजूबाजूची मुलं मोबाईलच्या नादात सारं विश्व विसरली असताना मयंक त्या वाटेवर जाणार नाही, याची दक्षता त्यांनी घेतली. मुलाला त्यांनी गिरीभ्रमणाचा नाद लावला. अभ्यास, तिरंदाजी आणि दुर्गभ्रमण यांचा त्यांनी मयंकला ताळमेळ घालून दिला. आता मयंक एकामागून एक शिखरं पादाक्रांत करीत असताना वडील म्हणून रमांकात यांना अभिमान आहे. परंतु त्याचबरोबर इतर मुलांसमोर मयंकनं आदर्श घालून दिला, याचंही त्यांना समाधान आहे.
कळसुबाई सर करण्याचं स्वप्न : पालघर जिल्ह्यातील सर्वात उंच असलेला 687 मीटर उंचीवरचा गंभीर गड त्यानं सर केलाय. आकांक्षेपुढं गगनही ठेंगणं असल्याचं त्यानं दाखवून दिलं. लवकरच तो महाराष्ट्रातील 1646 मीटर उंचीचं सर्वोच्च कळसुबाई शिखर सर करणार आहे.
हेही वाचा -