मुंबई : "आयसीसी चॅम्पियन्स करंडक स्पर्धेत भारतानं विराट कोहलीच्या 'विराट' शतकाच्या जोरावर कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा धुव्वा उडवला. भारतानं पाकिस्तानचा 6 गडी राखून पराभव केलाच. या पराभवामुळे पाकिस्तानवर स्पर्धेतून बाहेर फेकलं जाण्याची नामुष्की ओढवली. विराट कोहलीची अप्रतिम फलंदाजी, कर्णधार रोहित शर्माची रणनीती आणि त्याला गोलंदाज, फलंदाजांची साथ यामुळे भारतानं हा भन्नाट विजय मिळवला. भारतीय संघ एक रणनीती आखून खेळताना दिसला. भारताविरुद्ध खेळताना कायम दबावाखाली खेळणाऱ्या पाकिस्तानी संघावर भारतीय संघानं आणखी दबाव टाकला. त्यामुळे पाकिस्तानचा पराभव झाला," अशी प्रतिक्रिया कर्णधार रोहित शर्मा याचे प्रशिक्षक दिनेश लाड यांनी दिली. "पुढच्या फेरीत दिग्गज संघांशी सामना होणार आहे. विजयासाठी या संघांना लोळवावं लागणार आहेच. भारतीय संघ जसा खेळत आहे, तसंच खेळत राहावं," असं मत दिनेश लाड यांनी ईटीव्ही भारतशी साधलेल्या एक्स्क्लूसिव्ह संवादात व्यक्त केलं.
पाकिस्तानचा संघ युद्ध लढत आहोत, अशा दबावात खेळला ? : भारताच्या विजयावर तुमची पहिली प्रतिक्रिया काय, यावर दिनेश लाड यांनी सांगितलं की, "पाकिस्तानचा संघ भारताविरुद्ध कायम दबावात खेळतो. फलंदाजी करतानाही ते दबावात होते. त्यामुळे त्यांच्या फलंदाजांना मोठी धावसंख्या उभारता आली नाही. गोलंदाजीमध्येही त्यांच्यावर दडपण आलं. त्याउलट भारतीय खेळाडू कोणत्याही दडपणाविना खेळले. भारत-पाकिस्तान सामना म्हटलं की त्यांचे खेळाडू जणू काही युद्ध लढत आहोत, अशा दबावात असतात. त्यामुळेच त्यांचा पराभव झाला," असं दिनेश लाड म्हणाले. पाकिस्तानचा कर्णधार मोहम्मद रिझवान आणि सौद शकील यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, रिझवान बाद झाल्यानंतर त्यांचा डाव कोसळला. मधल्या फळीत नवखे फलंदाज अपयशी ठरले, यावर लाड म्हणाले की, "हे खरं आहे. त्यांच्या मधल्या फळीत नवखे फलंदाज आहेत. ते दडपण हाताळण्यात अपयशी ठरले. त्यांच्याकडून चुका झाल्या. भारतीय संघ फलंदाजी करतानाही हेच जाणवलं. दडपणामुळेच त्यांनी दोन महत्त्वाचे झेल सोडले."
शाहीन आफ्रिदी, नसीम शाह आणि हारिस राऊफ यांच्यासाठी खास रणनीती होती का ? : भारतीय संघानं आक्रमक सुरूवात केली. पाकिस्तानचे स्टार गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी, नसीम शाह आणि हारिस राऊफ हे खरं तर भारतासाठी यापूर्वी डोकेदुखी ठरले आहेत. त्यांच्यासाठी या लढतीत खास रणनीती दिसली का, या प्रश्नावर दिनेश लाड यांनी सांगितलं की, "एक रणनीती नक्कीच दिसली. या गोलंदाजांना स्थिरावू द्यायचंच नाही. रोहित, शुभमन गिल, श्रेयस अय्यर, विराट आणि शेवटी आलेला हार्दिक पांड्या यांनी तिन्ही प्रमुख गोलंदाजांवर आक्रमण केलं. सुरूवातीला रोहित आणि गिल यांनी आक्रमक फलंदाजी केली. नंतर विराट, श्रेयस आणि पांड्या यांनीही तोच कित्ता गिरवला. हीच रणनीती गेम चेंजर ठरली."
कर्णधार म्हणून रोहितला किती गुण ? : आजच्या सामन्यात कर्णधार म्हणून रोहितच्या डावपेचांबद्दल दिनेश लाड म्हणाले, "त्यानं उत्तम कॅप्टन्सी केली. गोलंदाजांचा वापर त्यानं अतिशय उत्तम प्रकारे केला. योग्य वेळी हार्दिक, अक्षर पटेल, रविंद्र जाडेजा, कुलदीप यादव यांना गोलंदाजीला आणलं आणि त्यांनी प्रत्येकवेळी विकेट्स मिळवून दिल्या. फलंदाजी करतानाही तो स्वत:चा विचार न करता खेळतो. आक्रमक फलंदाजी करुन धावगती वाढवायची, गोलंदाजांना स्थिरावू द्यायचं नाही, यावर त्याचा भर असतो. यामुळे होते काय, की नंतर येणाऱ्या फलंदाजांवर धावगतीचं दडपण राहत नाही. त्यांना स्थिरावण्यास वेळ मिळतो."
विराटला फुल्ल मार्क्स : "विराट कोहलीला आजच्या सामन्यात फुल्ल मार्क्स द्यायला हवे. त्यानं अप्रतिम खेळी केली. महत्त्वाचं म्हणजे, पाकिस्तानविरुद्ध तो नेहमी जोरदार कामगिरी करतो. यापूर्वीही त्यानं अनेकदा स्वत:च्या कामगिरीच्या जोरावर भारताला पाकिस्तानविरुद्ध विजय मिळवून दिले आहेत. त्याचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे," असं दिनेश लाड म्हणाले.
यापुढं कोणत्या संघाचं असेल मोठं आव्हान ? : पाकिस्तान या स्पर्धेतून बाहेर पडला आहे. आता यापुढं ऑस्टेलिया, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका यापैकी कोणत्या संघाचं भारतासमोर मोठं आव्हान असेल, यावर "या संघांविरुद्ध खेळावंच लागणार आहे. पण, एका ठराविक संघाबद्दल असं सांगू शकत नाही. काल इंग्लंडविरुद्ध ऑस्ट्रेलियानं 351 धावांचं लक्ष्य पार केलं. इंग्लंडचा संघ वरचढ ठरत आहे, असं दिसत असतानाच ऑस्ट्रेलियानं मोठा विजय मिळवला. त्या दिवशी तो संघ कसा खेळतो, यावर अवलंबून आहे," असं लाड म्हणाले.
हेही वाचा :