प्रयागराज- महाकुंभ मेळाव्यात पवित्र स्नानासाठी करोडो भाविकांनी उत्तर प्रदेशमधील प्रयागराजला भेट दिल्यानंतर वाद निर्माण झाला आहे. गंगेतील पाण्यात (गंगाजल) कॉलिफॉर्म बॅक्टेरिया असल्याचा केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळानं (सीपीसीबी) अहवालातून दावा केला. त्यावर संशोधक, पद्मश्री डॉ. अजय सोनकर यांनी थेट संगमावर जात गंगेतील पाण्यात कॉलिफॉर्म बॅक्टेरिया वाढत नसल्याचा दावा केला.
महाकुंभ मेळाव्यादरम्यान गंगेच्या पाण्याचं तापमान १० ते १५ अंशांच्या दरम्यान राहिले. बॅक्टेरिया हे २० अंशांपेक्षा जास्त असताना पाण्यात वाढतात, अशी माहिती देत संशोधक डॉ. अजय सोनकर यांनी महाकुंभ मेळाव्यात गंगाजल पिऊनही दाखविलं आहे. गंगाजल हे अंघोळीसाठी आणि पिण्यासाठी पूर्णपणं योग्य असल्याचा दावा डॉ. सोनकर यांनी केला. डॉ. अजय सोनकर यांनी अनेक भाविकांसमोर गंगाजल पिऊन दाखविलं. पाण्यात कोणतेही हानिकारक बॅक्टेरिया नाहीत ( Gangajal purity), हे त्यांनी एकप्रकारे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. गंगाजलामध्ये असलेले गुणधर्म आणि त्यामधील कमी तापमान बॅक्टेरियाच्या वाढीसाठी पोषक नसल्याचं डॉ. सोनकर यांनी सांगितलं.

गंगेच्या पावित्र्याबद्दल शंका नाही. गंगेचे पाणी त्याच्या विशेष गुणधर्मांमुळे शतकानुशतके शुद्ध मानलं जातं-संशोधक, पद्मश्री डॉ. अजय सोनकर
कोलिफॉर्म बॅक्टेरियासाठी प्रतिकूल तापमान-गंगाजलचं तापमान २० अंश सेल्सिअसपेक्षा कमी असल्यामुळे विष्ठेत आढळणारे कोलिफॉर्म बॅक्टेरिया पूर्णपणे निष्क्रिय राहतात. तर संपूर्ण महाकुंभमध्ये गंगेच्या पाण्याचं तापमान फक्त १० ते १५ अंशांच्या दरम्यान राहिलं, याकडं त्यांनी लक्ष वेधलं. त्रिवेणी संगमावर असलेल्या विविध घाटांवर डॉ. अजय सोनकर यांनी भाविकांच्या समोर गंगेच्या पाण्याचं तापमानदेखील तपासलं. बॅक्टेरिया वाढण्यासाठी तापमान ३५ ते ४० अंशांच्या दरम्यान असावं लागतं.
काय आहे सीपीसीबीचा अहवाल- केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ (सीपीसीबी) एनजीटीला (नॅशनल ग्रीन ट्रिब्यूनल) पाठवलेल्या अहवालात गंगाजलमध्ये १०० मिली पाण्यात २५०० युनिट्सपेक्षा जास्त प्रमाणात कोलिफॉर्म बॅक्टेरिया असल्याचं म्हटलं होतं. यानंतर, एनजीटीनं (नॅशनल ग्रीन ट्रिब्यूनल) उत्तर प्रदेश प्रदूषण नियंत्रण मंडळाला फटकारलं होतं. कोलिफॉर्म बॅक्टेरिया प्राण्यांच्या आतड्यांमध्ये देखील आढळतो. पाण्यात हा बॅक्टेरिया आढळल्यानं जल प्रदूषण वाढल्याचं चिन्ह वाढल्याचं मानलं जातं. या बॅक्टेरियामुळे, मळमळ, उलट्या, अतिसार आणि इतर संसर्गजन्य आजारांना सामोरं जावं लागतं.
२८ फेब्रुवारीला एनजीटी घेणार सुनावणी- यापूर्वीच डॉ. अजय कुमार सोनकर यांनी प्रयोगशाळेतील चाचण्यांचा दाखला देत गंगेचे पाणी शुद्ध असल्याचा दावा केला होता. गंगाजलमध्ये आढळणारे ११०० प्रकारचे बॅक्टेरिया हे हानीकारक बॅक्टेरिया नष्ट करत असल्याचाही त्यांनी दावा केला होता. उल्लेखनीय बाब म्हणजे गंगाजलचे पाणी अंघोळीबरोबरच पिण्यासाठी अयोग्य असल्याचं सीपीसीबीनं म्हटलं होतं. गंगाजलच्या प्रदूषणाबाबत एनजीटी ही २८ फेब्रुवारीला सुनावणी घेणार आहे. या सुनावणीपर्यंत केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अहवालानुसार उत्तर प्रदेश नियंत्रण मंडळानं कारवाई करणं अपेक्षित आहे.
हेही वाचा-