मुंबई : फेब्रुवारी महिना आता जवळपास संपत आला आहे. त्यामुळे आता राज्यात उष्णतेची चाहूल लागण्यास सुरुवात झाली. थंडी अद्याप संपलेली नसताना देखील कोकणपट्ट्यात सामान्य तापमानाच्या तुलनेत तीन ते पाच अंश सेल्सिअस उष्णतेत वाढ झाल्याची नोंद हवामान विभागानं केली आहे. त्यामुळे आज सोमवार 24 फेब्रुवारी आणि मंगळवार 25 फेब्रुवारी या दोन दिवसांसाठी हवामान विभागानं कोकणासह गोव्याला तापमानाचा येलो अलर्ट जारी केला आहे.
गोवा किनारी भागात कमाल तापमानाचा पारा वाढणार : याबाबत हवामान विभागाच्या मुंबई मंडळातील शास्त्रज्ञ सुषमा नायर यांनी दिलेल्या माहितीनुसार, "राज्यात आता अवकाळी पावसाचं संकट दूर झालं आहे. पुढील काही दिवस हवामान उष्ण व कोरडं राहणार असून, महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांसह गोव्यात पारा सामान्य तापमानाच्या तुलनेत तीन ते पाच अंश सेल्सिअसनं अधिक राहणार आहे. मागील काही दिवस मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात कमाल तापमानाचा पारा एक ते तीन अंश सेल्सिअसनं वाढलेला पाहायला मिळाला. तर, पुढचे दोन दिवस म्हणजे 24 व 25 फेब्रुवारी रोजी मुंबई, ठाणे शहरासह कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांसह गोवा किनारी भागात कमाल तापमानाचा पारा तीन ते पाच अंश सेल्सिअसनं अधिक राहणार आहे.
पश्चिम पट्ट्यात चक्रावात : प्रादेशिक हवामान विभाग मुंबई मंडळानं दिलेल्या माहितीनुसार, चक्रकार वाऱ्यांमुळे देशाच्या पश्चिम पट्ट्यात चक्रावात तयार होत असून, हिमालयातील येणाऱ्या थंड वाऱ्यांची आर्द्रता कमी होत जाणार आहे. पुढं 28 तारखेपर्यंत अरबी समुद्राच्या भागात हवामानाची ही स्थिती राहणार आहे. याचा परिणाम म्हणजे 24 आणि 25 फेब्रुवारी दोन दिवस कोकणासह गोव्यात सामान्य तापमानाच्या तुलनेत कमाल तापमानात तीन ते पाच अंश सेल्सिअसनं वाढ होणार आहे. त्यामुळे हवेतील उष्णता व आर्द्रतेत देखील वाढ होणार आहे. या भागातील नागरिकांना उष्णता व घामाच्या धारांचा सामना करावा लागणार आहे.
हेही वाचा :