पुणे Sex Education Parenting Tips : लैंगिक अत्याचार, छळ आणि बलात्काराच्या घटनांमुळे देशात प्रचंड संतापाची लाट उसळली आहे. या घटना वारंवार घडत असल्यानं पुरोगामी महाराष्ट्रातील पालक आणि विद्यार्थ्यांमध्येही भीतीचं वातावरण आहे. आपल्या पाल्यासोबत एखादी अनोळखी व्यक्ती जरी बोलत असली तरी त्यास संशयास्पद दृष्टिकोनातून बघितलं जात आहे. अशात पालक म्हणून प्रत्येक पालकांना आपल्या मुला-मुलीची काळजी वाटणं साहाजिक आहे. आपल्या मुलांनी सुरक्षित आणि आनंदी आयुष्य जगावं हे प्रत्येक पालकाला वाटतं, त्यामुळे ते त्यासाठी विविध प्रकारचे प्रयत्नही करतात.
पालक चिंतेत : आपलं मूल जोपर्यंत लहान असतं तोपर्यंत त्यांचा बहुतांश वेळ पालकांसोबत जातो. परंतु सध्याची बदलती जीवनशैली पाहता आणि दररोज मुलांसोबत होणाऱ्या विविध घटना पाहता त्यांच्याबद्दल पालक अधिकच काळजीत आणि चिंताग्रस्त आहेत. विशेषतः मुलींबद्दल हा विचार अधिक केला जातो. घराबाहेर पाठवताना किंवा एखाद्या नव्या व्यक्तीसोबत पाठवताना भीती वाटते. मुलांना जरी काही कळत नसले तरीही पालकांना सर्वकाही कळत असतं. समाजात सध्या एवढी असुरक्षितता निर्माण झाली आहे की, जरी एखाद्या मुलासोबत कोणतीही घटना घडली की त्याचा संदर्भ आपल्या मुलासोबत जोडू पाहतात.
यातच मुलांना योग्य वेळी आणि योग्य वयात काही गोष्टींबद्दल सांगणे गरजेचे असते. मुलं जसजशी मोठी होतात तेव्हा त्यांना काही गोष्टी कळू लागतात. दुसऱ्या व्यक्तींशी कसं वागावं हे सुद्धा शिकवलं पाहिजे. जर एखाद्या व्यक्तीनं तुम्हाला कोणत्या हेतूने स्पर्श केला आहे. हे सुद्धा पालकांनी आपल्या मुलांना वेळीच सांगितलं पाहिजे. जेणेकरून मुलं चुकीच्या घटनांबाबत बोलू तरी शकतील. त्यामुळे पालकांनी आपल्या मुलासोबत एक मित्रत्वाचं नातं तयार केलं पाहिजे.
माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटना : याच अनुषंगाने पिपंरी चिंचवड शहरातील वंदना सुनिल मांढरे-जगताप (एम. ए. क्लिनिकल सायकॉलॉजी बी. एड., एम. एस. डब्ल्यू पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन चाईल्ड सायकॉलॉजी) यांनी लहान मुलांच्या बाबतीत घ्यावयाची काळजी आणि जागरूकता विषयी माहिती दिली. त्या म्हणाल्या की, आजतागायत ज्या अत्याचाराच्या घटना घडताहेत त्या माणुसकीला काळीमा फासणाऱ्या, संतापजनक आहेत. अशा वातावरणात आपण आपल्या मुलाची काळजी घेताना आपल्या मुलांवर लक्ष ठेवणं तसंच त्यांच्यात होणारे बदल जाणून घेणं पालक आणि शिक्षकांसाठी खूप गरजेचं आहे. अचानक मुलांच्या स्वभावामध्ये बदल होत आहे. शांत होणे, जेवण टाळणे, झोप व्यवस्थित न होणे, झोपेमध्ये दचकून उठणे, एखादी अनोळखी व्यक्ती समोरून आली की घरात पळून जाणे किंवा नजरेला नजर न देणं, मनातल्या गोष्टी सांगायला घाबरतात या लक्षणांना पालक आणि शिक्षकांनी ओळखलं पाहिजे. अशावेळी या गोष्टी न टाळता समुपदेशक किंवा डॉक्टर यांच्याशी संपर्क करणे महत्वाचे आहे.
शाळांमध्ये साधा संवाद : शाळांनी चर्चासत्र घडवली पाहिजेत, विद्यार्थ्यांशी एकोप्याचा संवाद केला पाहिजे, त्यांच्या मातृभाषेतच पालकांशी संवाद करून विद्यार्थ्यांच्या समस्या आणि बदल याविषयी चर्चा केली पाहिजे. घटना घडल्यानंतर जेव्हा आपण जागरुक होतो, त्यावेळी आपण या महत्त्वाच्या विषयासंबंधी चर्चा करून वेळ घालवतो. पूर्व विचार करून मुलांविषयी योग्य ती काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे. पालकांनी पुढील काही गोष्टीवर लक्ष द्यावे.
गुड टच आणि बॅड टचबद्दल माहिती : पालकांनी ३-४ वर्षाच्या मुलांना गुड टच आणि बॅड टचबद्दल माहिती द्यावी. त्यांचे कपडे अनोळखी व्यक्तीसमोर बदलू नका. मुलांना समजवा की, त्यांच्या प्रायव्हेट पार्ट्सला त्यांच्या व्यतिरिक्त कोणीही स्पर्श करु शकत नाही. मुलांना हेसुद्धा सांगा जर डॉक्टर त्यांच्या पालकांच्या उपस्थितीत टच करत असतील तर तो गुड टच आहे. नातेवाईकही तुमच्या प्रायव्हेट पार्ट्सला हात लावू शकत नाहीत, हे मुलांना सांगा. मुलांसोबत नेहमीच गप्पा मारा. तुम्ही त्याच्यासोबत असल्याचा विश्वास त्यांच्यामध्ये निर्माण करा.
विशेष मुलांवर जास्त परिणाम : मतीमंद, दिव्यांग किंवा विशेष मुलं असतील तर त्यांच्या मनावर खूप मोठा परिणाम होतो. परंतु पालक म्हणून लवकर ओळखणे खूप महत्वाचे आहे. विशेष मुलं यासंबधी लवकर बोलू शकत नाहीत. घाबरून त्यांच्या शरीरावर लवकर अनपेक्षित प्रभाव पडतो. या विशेष मुलांबाबत काय काळजी घ्यावी, त्यासाठी पिंपरी चिंचवड शहरातील दिव्यांग, मतीमंद, विशेष मुलांच्या तज्ञ शिक्षिका जयश्री शिंदे यांच्याशी संवाद केला असता त्यांनी बोलताना सांगितलं की, पालक आणि घरच्यांनी विशेष मुलांना खूप सारे प्रेम देत, त्यांना आपलंसं करून त्यांच्याशी वारंवार संवाद साधणे गरजेचे आहे. विशेष मुलं म्हटलं तर त्यांना पहिल्यांदा कुठलीच गोष्ट समजत नाही. त्यांना वारंवार ती गोष्ट शिकवावी लागते. प्रत्येक विशेष मुलांच्या शाळांमध्ये हेच वारंवार शिकवणे खूप गरजेचे आहे. जर विशेष मुलांना लवकर समजत नसेल तर त्यांना सांकेतिक भाषेत समजून विचारणं खूप गरजेचं आहे. कारण विशेष मुलांच्या शरीरात खूप चांगल्या प्रकारचा कलात्मक गुण असतो त्या गुणांना पालकांनी वेळीच ओळखून त्यांच्याशी संवाद साधावा, यात दिरंगाई करू नये.
मुलांच्या वागण्याकडे लक्ष द्या : मुलांना गुड टच आणि बॅड टचबद्दल कळत नसतं. त्यामुळे ते एखाद्याला मोकळेपणाने आपल्या मनातील गोष्ट सांगत नाहीत. ते मनात त्या गोष्टी साठवून ठेवत त्रस्त होतात. त्यांचे अभ्यासातही काही वेळेस लक्ष लागत नाही. अशी स्थिती त्यांच्या शारीरिक विकासावर प्रभाव टाकते. त्यामुळे आपल्या मुलाच्या वागण्याकडेही पालकांनी लक्ष दिलं पाहिजे. जर तुमचं मूल अधिक शांत राहात असेल किंवा स्वतःच्याच धुंदीत राहात असेल तर त्याला त्याबद्दल विचारा, काळजी आणि संगोपनात कमी पडू नका.