महाराष्ट्र बंद: कोल्हापुरात हसन मुश्रीफ यांच्यासह सतेज पाटील यांनी काढला कँडल मार्च
कोल्हापूर - उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथील शेतकरी हत्याकांडाच्या निषेधार्थ शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते बिंदू चौकपर्यंत शनिवारी कँडल मार्च काढण्यात आला. यावेळी मृत्युमुखी पडलेल्या शेतकरी बांधवांना कोल्हापुरातील महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून आदरांजली वाहण्यात आली. महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी आपणही मोठ्या संख्येने सहभागी होऊन बंद यशस्वी करा, असे आवाहन गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी केले. यावेळी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी बंद यशस्वी करा, असे आवाहन केले. यावेळी महाविकास आघाडीचे नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.