यवतमाळ : राळेगाव-बाभूळगाव विधानसभा मतदारसंघात राळेगाव, कळंब व बाभूळगाव या तीन तालुक्यांचा समावेश होतो. ही तिन्ही तालुके आदिवासीबहुल आहेत. हा मतदारसंघ अनुसूचित जमातीसाठी राखीव आहे. या मतदारसंघातील आमदारांना कॅबिनेट मंत्रिमंडळात संधी मिळते, असा अनुभव आहे. त्यामुळे येथून निवडणूक लढण्यास अनेक जण उत्सुक आहेत. यंदाच्या निवडणुकीत भाजप व काँग्रेसमध्ये खरी स्पर्धा दिसून येत आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव विधानसभा मतदारसंघ आदिवासी बहुल मतदारसंघ असून अनेक छोटे खेडे वस्ती, पोड, बेडा यांनी व्यापलेला आहे. मतदारसंघातील 85 टक्के ग्रामीण जनतेची नाळ शेतीशी जुळलेली आहे. सुरुवातीला हा मतदारसंघ येळाबारा मतदारसंघ म्हणून ओळखला जात होता. 1962 साली प्रथम या मतदारसंघातून काँग्रेस महादेव खंडाते आमदार म्हणून निवडून आले. त्यानंतर हा मतदारसंघ 1967 पासून येळाबारा ऐवजी राळेगाव विधानसभा मतदारसंघ म्हणून ओळखला जाऊ लागला. त्यावेळी अपक्ष उमेदवार एन.एन भलावी हे आमदार म्हणून येथून जिंकून आले होते. त्यानंतर सन 1972 साली काँग्रेसचे आनंदराव देशमुख येथून जिंकून आले होते. त्यानंतर सन 1978 आणि 1980 झाली काँग्रेसचे सुधाकरराव दुर्वे हे सलग दोन वेळा आमदार राहिले. त्यानंतर सन 1985 साली गुलाबराव उईके हे काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले होते. मात्र, 1990 साली जनता दलाचे चक्र मतदारसंघात फिरले आणि नेताजी राजगडकर हे या विधानसभेतून जिंकून आले. त्यानंतर काँग्रेसचे नेते आणि प्राध्यापक वसंत पुरके यांनी 1995 साली पहिल्यांदा निवडणूक लढवली आणि सलग चार टर्म म्हणजेच 1995,1999, 2004 आणि 2009 असे चार टर्म पुरके या मतदारसंघांमध्ये आमदार म्हणून जिंकून आले. मात्र 2014 च्या निवडणुकीमध्ये भाजपचे अशोक उईके यांनी पहिल्यांदा राळेगाव विधानसभेत कमळ फुलविले.अशोक उईके यांनी या मतदारसंघामध्ये पहिल्यांदा 38750 मतांनी विजयश्री मिळवला. 2014 मध्ये भाजपचे अशोक उईके यांना 1 लाख 618 मते मिळाली होती तर वसंत पुरके यांना 61 हजार 868 मते मिळाली.
हेही वाचा - विधानसभा निवडणूक : राज्यात २ हजार ७४७ मतदान केंद्र संवेदशील
राळेगाव मतदारसंघांमध्ये सध्या 2 लाख 81 हजार 271 एकूण मतदार आहेत. यामध्ये 1 लाख 44 हजार 342 पुरुष तर एक लाख 36 हजार 928 महिला मतदार आहेत. आमदार अशोक उईके यांना नुकतेच मंत्रिमंडळ विस्तारामध्ये आदिवासी विभागाचे मंत्री म्हणून जबाबदारी मिळाली आहे. त्यात ते कॅबिनेट मंत्री झाल्यामुळे अशोक उईके यांची आता ताकद वाढली आहे. छोट्या-मोठ्या गावात त्यांचा दांडगा जनसंपर्क आणि त्यांची आपुलकीची भाषा यामुळे ते सर्वपरिचित आहेत.
निवडणुकीवर अवनीचीही छाप-
दुसरीकडे काँग्रेसचे नेते वसंत पुरके हे या मागील 5 वर्षांपासून या मतदारसंघात काँग्रेसचे तिकीट मिळेल या आशेवर निवडणुकीच्या कामाला लागलेले आहे. त्यांनी मतदारसंघही पिंजून काढला आहे. आदिवासी बहुल असलेल्या या मतदारसंघांमध्ये आजही ग्रामीण भागांमध्ये रस्त्यांची दुरवस्था आहे. अनेक रस्त्यांची चाळण झालेली पहायला मिळते. अनेक गावांमध्ये वीज पुरवठा लपंडावा सारखा खंडित होणे, ही शेतकरी आणि सामान्य नागरिकांची डोकेदुखी बनली आहे. मागील वर्षी मोहदा आणि लगतच्या 30 गावात अवनी वाघिणीची दहशत होती. वाघिणीच्या हल्ल्यात 13 लोकांचा बळी गेला होता. त्यामुळे वनविभागाच्या कारभारावर या भागातील जनतेचा प्रचंड रोष होता. त्यामुळे या निवडणुकीवर अवनी प्रकरणाची छाप राहणार आहे.
हेही वाचा - पायाला भिंगरी बांधून बाहेर पडलोय; जे गेले त्यांना घरीच बसविणार - शरद पवार
येथील सर्वाधिक मतदार हे शेतकरी असून येथील शेतकरी खरीप हंगामात कापूस, तूर ,सोयाबीन या पिकांची लागवड करतो. पीक निघाल्यावर त्यांना योग्य भाव मिळत नाही येथे कापसाची मोठी बाजारपेठ सुद्धा नसल्याने शेतकऱ्यांना लगतच्या वर्धा जिल्ह्याच्या बाजार समितीवर अवलंबून राहवे लागते. मतदार संघातील ग्रामीण भागात आरोग्याच्या सुविधांची वानवा पाहायला मिळते. अनेक प्राथमिक उपकेंद्र आणि आरोग्य केंद्रामध्ये कर्मचारी वेळेवर उपलब्ध नसणे आणि रुग्णांवर वेळेवर योग्य उपचार न झाल्यामुळे रुग्णांना नाईलाजाने उपचारासाठी यवतमाळ गाठावे लागते. या मतदारसंघामध्ये बेंबळा धरणाचे कॅनल असले तरी त्या धरणाचे कॅनल शेवटपर्यंत पोहोचले नाही आणि ठीक-ठिकाणी त्यांची दुरुस्ती झाली नाही. आदिवासी भागातील शाळांची अवस्था अनेक ठिकाणी खराब झाली आहे. या शाळांमध्ये छत नाही त्यांची दुरुस्तीचे काम सुद्धा प्रशासनाने मागील अनेक वर्षांपासून केले नाही. त्यामुळे अशा ठिकाणच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांचा कोंडमारा होतो.
हेही वाचा - विधानसभा निवडणूक: नागपूरमध्ये भाजपच्या गडाला काँग्रेस देणार का हादरा?
राळेगाव विधानसभा मतदारसंघात आदिवासी पोड, वस्ती, बेडा यांची संख्या अधिक आहे ते पळसकुंड, भीमकुंड, जिरामीरा, निमगव्हाण किनवट आदी लगतच्या भागांमध्ये यांची वस्ती आहे. मात्र, त्यांच्या मूलभूत सुविधा अद्याप सुटलेल्या नाहीत किंवा अनेक सुविधांपासून ते वंचित आहेत. शिक्षणामध्ये मतदारसंघ पिछाडलेला असल्याने तरुणांना पदवीच्या पुढच्या शिक्षणासाठी यवतमाळ किंवा वर्धा गाठावे लागते. या भागांमध्ये एमआयडीसी सुद्धा नाही त्यामुळे बेरोजगारांच्या हाताला काम आणि तरुणांना उच्च शिक्षण आणि येथे योग्य संधी मिळत नाही. अशा समस्या असताना वसंत पुरके यांना सलग चार वेळा आणि मागील वेळी अशोक उईके यांना मतदारांनी बदल होईल म्हणून संधी दिली. आता या मतदारसंघांमध्ये भाजपचे आमदार अशोक उईके यांच्या पाठीमागे मतदारसंघातील अनेक वजनदार नेते सोबत आहेत. यामध्ये जिल्हा परिषद सदस्य, भाजपचे राळेगाव परिसरातील स्थानिक नेते चित्तरंजन कोल्हे यांना काही खेड्यात मानणारा मोठा वर्ग आहे.
हेही वाचा - राणे 'वेटिंग'वरच राहतील; गृहराज्यमंत्री दिपक केसरकरांचा टोला
तर दुसरीकडे काँग्रेसचे प्रा. वसंत पुरके यांच्या सोबत काँग्रेसचे जुने जाणते नेतेही पाहायला मिळतात. असे असले तरी याचा मतदारसंघातील कळंब विकास आघाडीचे नेते आणि माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रवीण देखमुख यांनी आताच्या लोकसभा निवडणुकी पूर्वी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांच्या प्रवेशावरून पुरके समर्थकांमध्ये नाराजी होती. त्यामुळे वसंत पुरके आणि प्रवीण देशमुख यांच्या समर्थकांमध्ये टोकाचे मतभेद निर्माण झाले. त्याचा परिणाम काँग्रेस लोकसभा उमेदवार माणिकराव ठाकरे यांना मिळालेल्या कमी मतदानावरून दिसून आला.प्रवीण देखमुख याची कळंब आणि लगतच्या परिसरात मोठी ताकद आहे. अशावेळी ती ताकद पुरकेंच्या बाजूने राहते की पुरकेंच्या विरोधात जाते, हे येत्या निवडणुकीमध्ये नक्की दिसणार आहे. तर भाजपचे विद्यमान मंत्री अशोक उईके यांच्यासमोर त्यांच्याच पक्षातील राळेगाव नगरपरिषदेतील नेते अॅड. प्रफुल चव्हाण यांच्याशी मतभेत असल्याचे पाहायला मिळते. विशेष म्हणजे वर्धा जिल्हा परिषद अध्यक्ष आणि भाजप नेते नितीन मडावी हे या राळेगाव मतदारसंघातून भाजपकडून तिकीट मिळावे म्हणून उत्सुक आणि प्रयत्नशील आहेत. त्यांना प्रफुल चव्हाण यांचे समर्थन असल्याचे बोलले जाते. विविध अडचणी, वाढती बेरोजगारी, शिक्षण, आरोग्य यांच्या समस्यांनी त्रस्त जनता यंदा कुणाच्या सोबत उभी राहते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
भाजप विरुद्ध काँग्रेस अशी थेट लढत
काँग्रेसमध्ये तिकिटासाठीमध्ये मोठी स्पर्धा आहे. चार टर्म आमदार राहिलेले प्रा. वसंत पुरके यांच्या सोबत किरण कुमरे, सुरेश चिंचोळकर, चंद्रशेखर परचाके, संजीवनी कासार अशी नावे चर्चेत आहेत. तर पहिल्यांदाच या मतदारसंघात प्रहार जनशक्ती पक्षानेही उडी घेतली आहे. या पक्षाकडून गुलाब पंधरे हे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. संपूर्ण मतदारसंघात त्यांनी आपला प्रचाराचा धुरळा मागील तीन महिन्यांपासून उडविला आहे. त्यामुळे प्रहार पक्षाचे उमेदवार काँग्रेस किंवा भाजप या उमेदवारांचे गणित बिघडवणार असल्याचे बोलले जात आहे. असे असले तरी या राळेगाव मतदार संघामध्ये बीजेपी आणि काँग्रेस यांच्यातच थेट लढत होणार असून मतदार कुणाच्या गळ्यात विजयाची माळ टाकणार हे मतमोजणी नंतरच स्पष्ट होणार आहे.