यवतमाळ- जिल्ह्यातील उमरखेड येथे श्रावण सोमवार आणि बकरी ईद उत्साहात साजरी करण्यात आली. बकरी ईदनिमित्त मुस्लीम बांधवांनी नमाज अदा केली. यावेळी कोल्हापूर आणि सांगलीतील पूरग्रस्तांसाठी दुवा करण्यात आली. तसेच आर्थिक मदतही गोळा करण्यात आली.
राज्यातील कोल्हापूर, सांगली, साताऱ्यासह बऱ्याच भागात महापुराने थैमान घातले आहे. या अस्मानी संकटात अनेक संसार उघड्यावर आले आहेत. पूरग्रस्तांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी काही मुस्लीम युवकांनी पूरग्रस्तांसाठी आर्थिक मदत गोळा केली. ईदगाह नमाज नंतर नांदेड रोडवर मुस्लीम तरुणांनी पूरग्रस्तांसाठी मदतीचे आवाहन केले.
यावेळी मोठ्या संख्येने मुस्लीम बांधव नमाज झाल्यावर रोख मदत देताना दिसून आले. ईदच्या दिवशी सामाजिक संवेदना जपत त्यांनी मदत गोळा केली. मुस्लीम बांधवांनी माणुसकीचा परिपाठ घालून दिला. तर श्रावण सोमवारी असल्याने सर्व शिव मंदिरात मोठ्या प्रमाणावर भक्तांची गर्दी दिसून आली. याही ठिकाणी पुरग्रस्तांसाठी मदत गोळा करण्यात आली.