यवतमाळ- जिल्ह्यातील आर्णीमध्ये वर्दळ असलेल्या रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यात यावे असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतरही नगर परिषदेने अतिक्रमण जैसे थे ठेवले आहे. त्यामुळे अतिक्रमण हटवण्याच्या मागणीसाठी आर्णीतील नागरिकांनी नगपरिषदेसमोरच उपोषण सुरू केले आहे.
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतरही कारवाईत विलंब
जिल्ह्यातील आर्णी गावातील रस्त्यावरील अतिक्रमण हटवून रस्ता मोकळा करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी नगरपरिषदेला दिले होते. परंतू तत्कालीन मुख्याधिकारी निर्मला राशीनकर यांनी अतिक्रमणधारकांविरोधात कोणतीही कार्यवाही केलेली नाही. या आदेशानंतर अतिक्रमणधारकांनी न्यायालयात धाव घेत जागेवर दावा केला होता. मात्र, न्यायालयाने तो दावा फेटाळून लावला. यानंतरही राशीनकर यांनी अतिक्रमणधारकांविरोधात कोणतेही कडक पाऊल उचलले नाही.
मागणी मान्य करेपर्यंत उपोषण चालू ठेवण्याचा इशारा
संतापलेल्या नागरिकांनी राशीनकर यांच्याविरोधात कारवाई करण्यात यावी आणि लवकरात लवकर अतिक्रमण काढण्यात यावे या मागणीसाठी नगरपरिषदेसमोरच आमरण उपोषणास सुरुवात केली आहे. तसेच जोपर्यंत मागणी मान्य होत नाही तोपर्यंत उपोषण चालूच ठेवण्याचा इशारा देण्यात आला आहे.