यवतमाळ - विदर्भात सध्या उन्हाच्या तडाक्यामुळे तापमानाचा पारा वाढत चालला आहे. गुरूवारी (२६ एप्रिल) जिल्ह्यात सर्वाधिक ४४.५ अंश तापमानाची नोंद झाली आहे. या नोंदीने एप्रिल महिन्यातील गत १० वर्षामधील सर्व विक्रम मोडीत काढले आहेत.
हवामान खात्याने विदर्भात उष्णतेच्या लाटेचा अंदाज वर्तविला होता. हा अंदाज तंतोतंत खरा ठरला आहे. उन्हाच्या वाढत्या झळांनी शहरातील रस्त्यांवर दुपारी शुकशुकाट दिसून येत आहे.
या अचानक वाढलेल्या तापमानामुळे काल राज्य परिवहन मंडळाच्या बसणे पेट घेतल्याची घटना जोडमोहा गावाजवळ घडली. तर, यवतमाळ शहरातील तलाव फैल भागांमधील एका डीपीने पेट घेतला. येथील वायरिंग जळून खाक झाल्यामुळे जवळपास ६ ते ७ तास वीजपुरवठा खंडित झाला होता.