यवतमाळ - टिचभर पोटाची खळगी भरण्यासाठी मनुष्य काय करतो? याचा अंदाजही आपण लावू शकत नाही. मनुष्य जन्मला आला, की भाकरीच्या शोधात निघतो आणि दोन वेळची भाकरी कमविण्यासाठी धडपड करतो, याचा अनुभव सर्वांनाच आहे. पण, काहीजण त्या भाकरीसाठी चक्क आपल्या जीवाशी खेळतात. भाकरीसाठी जीवाशी खेळणाऱ्याचे दर्शन आज अचानक महागाव तालुक्यातील फुलसावंगी येथे झाले.
जालन्यातील शेख अब्दुल हा हातात दोन लांब लाकडे घेऊन आला आणि फुलसावंगीच्या गजबजलेल्या बाजारपेठेत त्याने त्याचा खेळ सुरू केला. हळू-हळू लोकांची गर्दी जमली आणि अब्दुल आपल्या दोन वेळच्या भाकरीसाठी खेळ करू लागला. रस्त्यावर जिमनॅस्टीक सारखा खेळ, चक्क हाताने दगड फोडणे, दोन उंच लाकडांवर उभे राहून चालणे, असे अनेक प्रकारचे खेळ तो करू लागला. हाताने दगड फोडताना तर कधी-कधी त्याचे हात रक्तबंबाळ होतात, तर अब्दुल त्याच्या खेळात व्यत्यय येऊ देत नाही आणि खेळ सुरूच ठेवतो. कारण त्याला हे निश्चित माहीत आहे, की खेळ पाहायला आलेले प्रेक्षक आल्या पावली निघून गेले, तर त्या खेळातून मिळणाऱ्या भाकरीचे काय होणार? हा विचार त्याला सतत येत असावा. म्हणून तो आपल्या जखमेची पर्वा न करता त्याकठीण दगडाला फोडून आपली हिस्स्याच्या भाकरीचा चंद्र शोधतो. असे समाजात कित्येक लोक आहेत की ते भाकरीचा चंद्र शोधण्यात गर्क आहेत.
हेही वाचा - यवतमाळ बाजार समितीमध्ये 14 हजार क्विंटल कापूस खरेदी; शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण
समाजातील काही लोकांना शिक्षण म्हणजे काय हे माहीत सुद्धा नाही. असे कित्येक अब्दुल या जगात असतील की दोन वेळच्या भाकरीचा चंद्र शोधण्यासाठी आपल्या गावापासून शेकडो किलोमीटर दूर वणवण फिरत असतील. कधी पासून हा खेळ करतो? असे अब्दुलला विचारले असता, 'साहब जबसे होश संभाला तब से ये खेल करता हूँ', असे तो म्हणाला. अब्दुलला ४ भाऊ आणि ३ बहिणी आहेत. परस्थिती खूप हलाकीची आहे. आपल्या परिवाराला दोन वेळची भाकरी मिळावी हीच त्याची नेहमी धडपड असते.
हेही वाचा - स्थानिक बेरोजगार युवकांच्या रोजगारासाठी शिवसेनेचे आंदोलन; 20 डिसेंबरपर्यंत दिली मुदत
आज समाजात कित्येक असे घटक आणि संस्था आहेत. जे भौतिक सुविधेपासून आणि शिक्षणापासून उपेक्षित आहेत. त्यांच्यासाठी आधार देण्याचे काम करणाऱ्या संस्थांनी अब्दुलसारख्या अनेकांकडे लक्ष देण्याची गरच आहे. त्यामुळे अब्दुलसारखे लोक हाताने कठीण दगड फोडून दोन वेळच्या भाकरीसाठी रक्त बंबाळ होणार नाहीत.
हेही वाचा - देशभरात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा बट्ट्याबोळ, महाराष्ट्र प्रदेश किसान काँग्रेसची तक्रार