वाशिम - मानोरा तालुक्यातील भायजीनगर येथे आज दुपारच्या सुमारास आग लागली. यात ८ घरे जळून खाक झाली. यात घरातील संसार उपयोगी वस्तू जळाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
सोमठाणा ग्रामपंचायतीच्या हद्दीत येत असलेल्या भायजीनगर येथे आगामी खरीप हंगामापूर्वी शेत मशागतीची कामे करणाऱ्या काही शेतकऱ्यांनी शेतातील धुरे पेटवून दिली होती. त्याचा मोठा भडका होऊन परिसरात एकमेकांना लागून असलेली घरे आगीच्या कचाट्यात सापडली असावी, अशी माहिती गावकऱयांनी दिली. त्यात घरांमधील संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले आहे. स्थानिक नागरिकांनी ही आग विझविण्याचा आटोकात प्रयत्न केला. यादरम्यान दिग्रस, मंगरूळपीर, कारंजा येथून अग्निशमन दलास पाचारण करण्यात आले. मात्र, तोपर्यंत सर्व घरातील लाखो रुपयांचे नुकसान झाले होते.
आगीत गावातील अनेक लोकांचे नुकसान झाले आहे. यात देवानंद शामराव वाघमारे, गजानन चंपत सोनोने, अरुण सुखदेव पखमोडे, अरूण विश्वनाथ कांबळे, गुलाब मोरकर, सुरेखा गजानन सोनोने, महादेव बापुराव कुडबे, शामराव बिरम, मिसनकर आणि अशोक उत्तम कोल्हे यांच्या घरांचा समावेश आहे.