वाशिम - कोरोनामुळे जिल्ह्यातील मजूर मोठ्या प्रमाणात आपापल्या गावी परतले आहेत. या मजुरांच्या हाताला काम मिळावे तसेच शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढून बियाण्यांची 50 टक्के बचत व्हावी, यासाठी कृषी विभागाच्यावतीने शेतकऱ्यांना टोकण पद्धतीने पेरणी करण्याचे तांत्रिक मार्गदर्शन करण्यात येत आहे. या मार्गदर्शनासाठी कृषी विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी स्वत: शेतात जाऊन शेतकऱ्यांची भेट घेत आहेत.
गेल्या काही दिवसांमध्ये पाऊस झाल्याने जिल्ह्यात शेतकऱ्यांची पेरणीसाठी लगबग सुरू आहे. जिल्ह्यात सोयाबीनची मोठ्या प्रमाणात लागवड होते. मंगरूळपीर तालुक्यातील तऱ्हाळा येथील कृषी सहाय्यक वर्षा भारती यांनी शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन टोकण पद्धतीने सोयाबीनची लागवड करण्याबाबत मार्गदर्शन करत आहेत. या पद्धतीचा अवलंब केल्यास 50 टक्के बियाण्यांची बचत होत असून उत्पन्न वाढण्यासही मदत होते. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी ही लागवड पद्धत फायद्याचीच असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले.
वाशिम जिल्ह्यातील शेती ही प्रामुख्याने पावसाच्या पाण्यावरच अवलंबून आहे. त्यामुळे पावसाळ्यातील खरीप हंगाम शेतकर्यांसाठी फार महत्त्वपूर्ण ठरतो. जिल्ह्यातील शेतकरी वर्ग कोरडवाहू जमिनीमध्ये सोयाबीन, तूर किंवा मिश्र पिकांच्या लागवडीला पसंती देतात.