वर्धा - केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी आणलेल्या नवीन कायद्याच्या विरोधात दिल्लीत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या शेतकरी आंदोलनाला समर्थन देण्यासाठी वर्ध्यात विविध संघटनांनी एकत्र येऊन धरणे दिले. गांधी पुतळ्याजवळ हे धरणे आंदोलन करण्यात आले.
दिल्लीत मोठ्या प्रमाणात शेतकरी हे नवीन कायद्यात हमीभावाचा समावेश करावा, यासाठी आंदोलन करत आहे. केंद्र सरकारने मंजूर केलेल्या विधेयकात अत्यावश्यक वस्तू कायदा, कंत्राटी पद्धतीने शेती करार, विधेयक रद्द करण्याची मागणी, यावेळी करण्यात आली. आंदोलनात किसान अधिकार अभियान, युवा सोशल फोरम अखिल भारतीय सर्वोदय मंडळ महिला किसान अधिकार मंच आणि काँग्रेस यांनी सहभाग नोंदवला.
शेतकरी जगाला तर देश जगेल -
आंदोलनात शेतकऱ्यांना सर्वच भागात ताकद मिळणे गरजेचे आहे. या आंदोलनाला लढ्याला स्वतःहून नागरिकांनी पुढे येणे गरजेचे आहे. शेतकरी जगाला तर देश जगेल. शेतकरी अडचणीत सापडला असल्यामुळे त्याला मदत करण्याचे आवाहन युवक कॉंग्रेसचे सुधीर पांगुळ यांनी केले.
हेही वाचा - तोडगा नाहीच..! शेतकरी-कृषीमंत्र्यांची बैठक संपली, आता ५ डिसेंबरला पुन्हा भेटणार ; पाहा LIVE अपडेट्स..
पक्ष कोणताही असो नुकसान मात्र शेतकऱ्याचेच...
आधीचे सरकार हटवून हे नवीन सरकार आणण्यामागचा उद्देश्यच हा आहे, भांडवलधारांचे भले व्हावे. यामुळे सरकारकडून अपेक्षा करू नये. शेतकऱ्याबद्दल सांगायचे झाले तर तो रांगेतील सर्वात शेवटचा आहे. एकाच पक्षाला दोष देऊनही चालणार नाही. सर्व पक्ष सारखेच आहेत. सर्वांनी शेतकऱ्यांना लुटायचे ठरवले आहे, अशी टीका सेवाग्राम नई तालीम समितीचे डॉ. सुगन बरंठ यांनी केली.
या आंदोलनात किसान अधिकार अभियाचे मुख्य प्रेरक अविनाश काकडे, शिवचरणसिंग ठाकूर, किसान अभियानचे जिल्हाध्यक्ष सुदाम पवार, धर्मपाल ताकसांडे, काँग्रेसच्या हेमलता मेघे, आदी. संघटनांचे नेते उपस्थित होते.