वर्धा - जिल्ह्यातील काही तालुक्यात तसेच शहरात शुक्रवारी पावसाचे आगमन झाले. शहरात २२ जूनला केवळ १० मिनिट झालेल्या पावसानंतर तब्बल ६ दिवसांनी आज वर्धेकरांना पावसाचे दर्शन झाले.
यावर्षी पाऊस लांबलाच नाही तर हुलकावणी सुद्धा देत आहे. वर्ध्यात सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. मात्र, पावसाचा दिवसभर पत्ताच लागला नाही. उलट अधून मधून सूर्यदेव तापताना दिसला. अखेर दिवसाच्या शेवटी वर्ध्यासह सेलू समुद्रपूर, पुलगाव देवळी तालुक्यात पाऊस झाला. या पावसाचा आनंद अनेकांनी लुटला. मात्र, शेतकऱ्यांना पाहिजे त्या प्रमाणात पाऊस न झाल्याने प्रतिक्षाच करावी लागणार आहे.
वर्धा जिल्ह्यात जून महिन्यातील पावसाची सरासरी १७१ मिमी इतकी आहे. पण यंदा पाऊस लांबल्याने सरासरीच्या केवळ ३४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. जून महिना संपायला आला तरी पावसाच्या सरासरीत तब्बल १३७ मिमी घट झाली आहे.
२१ ते २२ जूनच्या दरम्यान सक्रिय पाऊस होणार असा अंदाज देण्यात आला. एकीकडे कपाशीच्या पेरणीची वेळ निघून जात होती. तर अनेक शेतकऱ्यांनी धूळ पेरणी केली आहे. आता मात्र लांबलेल्या पावसाने जिल्ह्यात दुबार पेरणीची संकट ओढवले आहे. जून महिन्यातील सरासरी भरून काढण्यासाठी चांगल्या पावसाची गरज आहे. तेच लांबलेल्या पावसाने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर घातली आहे.