येवला (नाशिक)- येवला तालुक्यातील अंकाई शिवारात वीज कोसळून दोन जण ठार झाले. तर एक महिला जखमी झाली आहे. पाऊस चालू असल्याने रस्त्याच्याकडेला असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये आश्रय घेतला असता, या तिघांवर वीज कोसळली.
येवला तालुक्यातील अंकाई, तांदळवाडी या ठिकाणी शुक्रवारी जोरदार पाऊस झाला. यावेळी येवला - मनमाड महामार्गावर अंकाई शिवारात विजांच्या कडकडाटासह पाऊस चालू असताना रमेश गाडे राहणार देवळा यांनी रोडच्या कडेला असलेला पत्र्याच्या शेडमध्ये आश्रय घेतला. त्याच प्रमाणे हरबान सिंग शीख व सुखमीत सिंग शीख हे पती-पत्नी देखील पत्र्याच्या शेडमध्ये आश्रययला आले. पावसाचा जोर वाढतच असताना अचानक एक वीज या तिघांच्या अंगावर कोसळली. यामध्ये दोन्ही पुरुष जागीच ठार झाले, तर महिला गंभीररित्या जखमी झाली. तिला उपचाराकरिता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
वादळी पावसाने पिकांचे नुकसान-
तालुक्यातील अंकाई , तांदुळवाडी , धनकवाडी या गावांना वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला असून या पावसामुळे तालुक्यात काढून ठेवलेला कांदा झाकण्यासाठी शेतकऱ्यांची एकच धावपळ उडाली. परिसरात उन्हाळ कांदा काढण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे,बतर काही ठिकाणी कांदा शेतातच साठवून ठेवला असल्याने तो झाकण्यास शेतकऱ्याची धांदल उडाली होती.