ठाणे- भिवंडीत कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असतानाच आता मुंबई येथे गेलेल्या एका २३ वर्षीय तरुणाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. या रुग्णामुळे आता शहरातील आकडा १३ वर पोहचला आहे.
लॉकडाऊनच्या काळात सध्या भिवंडीतून इतर शहरांमध्ये जाण्यास सक्त मनाई असतानाही भिवंडीतून राजरोसपणे नागरिक इतर शहरांमध्ये जात आहेत. अशातच भिवंडीतील कामतघर परिसरातील २३ वर्षीय तरुण २५ एप्रिल रोजी मुंबई येथील गोवंडी व माहीम येथे गेला होता. मात्र, घरी परतल्या नंतर हा तरुण मनपाच्या फिवर क्लिनिकमध्ये गेला असता त्याच्या मुंबई प्रवासाची माहिती आरोग्य विभागाला मिळाली होती. त्यानंतर आरोग्य विभागाने तरुणाला २८ एप्रिल रोजी भिवंडीतील विलगीकरण केंद्रात दाखल केले होते.
गुरुवारी या तरुणाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती मनपाचे वैद्यकिय अधिकारी डॉ. जयवंत धुळे यांनी दिली. या तरुणामुळे आता भिवंडी शहरातील कोरोनाबाधितांचा आकडा १३ वर पोहोचला आहे. तर ग्रामीण भागातील रुग्णांचा आकडा १० असून भिवंडीतील शहर व ग्रामीण भागातील एकूण रुग्ण संख्या २३ व पोहोचली आहे. दरम्यान, बुधवारी ब्रम्हानंद कामतघर येथील महिला मुंबईला तिच्या माहेरी गेली होती, ती एक महिन्या नंतर सासरी कामतघर येथे परतली असता तिचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला, तरी देखील मनपा प्रशासनाने या महिलेची रुग्ण गणती भिवंडीत का केली नाही, याबाबत शहरात उलट सुलट चर्चा सुरू आहे.
हेही वाचा- कामोठेमध्ये अफवा पसरवणाऱ्या दोघांवरुद्ध गुन्हा दाखल