ठाणे - लॉकडाऊनमुळे हॉटेलसह रस्त्यावर खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या हातगाड्या बंद आहे. त्यामुळे उरलेले अन्न भटक्या कुत्र्यांना मिळेनासे झाले आहे. अशा शेकडो भटक्या कुत्र्यांची उपासमार पाहून एका तरुणाने घरात अन्न शिजवून तो स्वतःच्या हाताने भटक्या कुत्र्यांना मायेने घास भरवून माणुसकीचा धर्म जपत असल्याचे पाहवयास मिळाले आहे. तिरुमल थेवर असे या तरुणाचे नाव असून तो अंबरनाथमधील आयुध निर्माण कंपनीच्या परिसरात राहतो.
लॉकडाऊनमुळे रोजची कमाई करून पोट भरणाऱ्या माणसावर कठिण परिस्थिती आली आहे. अशा परिस्थितीतही भूतदया दाखविणारा तिरुमल थेवर हा सकाळ, संध्याकाळ अशा दोन्ही सांजा घरातच दोन वेळेचे अन्न भटक्या कुत्र्यांसाठी शिजवून लॉकडाऊनच्या दिवसापासून न चुकता अनेक भटक्या कुत्र्यांची भूक भागवत आहे. अंबरनाथमधील आयुध निर्माण कंपनीच्या वसाहतीत बहुतांश भटके कुत्रे आहेत. पूर्वी तिरुमल याचे वडील आयुध निर्माण कंपनीत कामाला होते. आता ते कंपनीतून निवृत्त झाल्यामुळे तिरुमल यांच्या कुटुंबाने कंपनीनजीक असलेल्या जावसई गावात वास्तव करत आहेत.
तिरुमल ज्या परिसरात वास्तव्याला आहे. त्या परिसरातील अनेक भटक्या कुत्र्यांचा लॉकडाउनच्या काळात तो अन्नदाताच ठरला आहे. इमानी भटके कुत्रेही अन्नदाता केव्हा जेवण घेऊन येईल. याची दोन्ही वेळा वाट पाहत असतात. विशेष म्हणजे त्याच्या दुचाकीची चाहूल या भटक्या कुत्र्यांना लागताच ते भटके कुत्रे त्याच्या दिशेने धाव घेतात. तिरुमल त्यांना अत्यंत मायेने स्वतःच घास भरवून त्यांची भूक भागवत आहे. तर दुसरीकडे बरीच मुके प्राणी उपाशी राहत आहेत. किमान अशा उपाशी राहणाऱ्या प्राण्याना पाण्याची आणि जेवणाची सोय करावी, असे अवाहन देखील तिरुमलने नागरिकांना केले आहे.