ठाणे - पूर्वी झालेल्या क्षुल्लक भांडणाचा राग मानत धरून दोन मित्रांनी मिळून दारू पिण्याच्या बहाण्याने बोलवून मित्राची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना उल्हासनगर मधील कॅम्प नंबर 4 येथील कॅनरा बँकेच्या पाठीमागे घडली. दिनेश साधुराम शर्मा (वय 30) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर, आशिष परेरा आणि सागर ठाकूर अशी आरोपींची नावे आहेत.
विठ्ठलवाडी पोलिसांनी आरोपी आशिष परेरा याच्यावर हिल लाईन पोलिसांनी हद्दपारीची कारवाई केलेली आहे. असे असतानाही हद्दपारीचे उल्लंघन करून तो पुन्हा उल्हासनगर शहरात मित्रांना भेटण्यासाठी आला होता. तेव्हाच त्याने आपला मित्र दिनेश याची हत्या केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार दिनेशला रात्री 11 वाजल्याच्या सुमारास आशिषने मोबाईल वर संपर्क करून बियरची बाटली घेऊन कॅम्प नंबर 4 परिसरातील कॅनरा बँकेच्या पाठीमागे बोलावले. मृतक दिनेश हा त्या ठिकाणी गेला असता, तेथे आशिष आणि सागर हे उपस्थित होते. त्यावेळी त्यांच्यात पूर्वी झालेल्या भांडणावरून शुल्लक वाद झाला. हा वाद विकोपाला जाऊन आरोपी आशिषने लोखंडी पत्रा दिनेशच्या डोक्यात मारला. तर, आरोपी सागरने लाकडी दांडक्याने त्याच्या डोक्यात जोरदार प्रहार केला. हे दोन्ही घाव वर्मी लागल्याने दिनेश रक्ताच्या थारोळ्यात जागीच कोसळला. हे पाहून दोघाही आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला.
घटनेची माहिती विठ्ठलवाडी पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमी अवस्थेत पडलेल्या दिनेशला उपचारासाठी मध्यवर्ती शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेप्रकरणी मनोज शर्मा यांनी दिलेल्या तक्रारीवरून विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात आशिष व सागर यांच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही आरोपींना पोलिसांनी भिवंडीमधील एका लॉज मधून ताब्यात घेतले आहे. दरम्यान, अटकेत असलेल्या दोन्ही मित्रांनी दिनेशच्या हत्येची कबुली दिल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश भोमे यांनी दिली आहे. तर, घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक माने करत आहेत.