ठाणे - कामावर जाण्यासाठी दुचाकीने निघालेल्या दोन सख्ख्या भावांचा अपघातात मृत्यू झाला. विटांच्या भरलेल्या भरधाव ट्रकने भरधाव वेगाने दुचाकीला समोरून धडक दिल्याने हा अपघात झाला. ही घटना अंजूर रोडवरील श्रीराम नगर येथे घडली. विश्वास लिकऱ्या भोईर (वय ४२) व निळकंठ भोईर (वय ३२ ) असे अपघातात मृत्यू झालेल्या दोघा भावांची नावे आहेत. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.
विश्वास आणि नीळकंठ हे दोघे भाऊ रेती काढण्याचे काम करीत होते. मात्र सद्या रेती उत्खननावर शासनाचे कडक निर्बंध असल्याने ते दोघेही गोदामांमध्ये माल उतरविण्याचे काम करीत होते. आज दुपारच्या सुमाराला या दोघा भावांना इंडियन कंपाऊंडच्या गोदामातून ट्रक रिकामा करण्यासाठी बोलावण्यात आले होते. त्यामुळे ते दोघे भाऊ मोटारसायकलवरून गोदामात जाण्यासाठी निघाले होते.
ते दोघे अंजूर रोडवरील श्रीराम नगर येथे आले असता त्यांना समोरून आलेल्या ट्रकने धडक दिली. या धडकेत दोघे भाऊ रोडवर खाली पडले असता ट्रकचा टायर त्यांच्या अंगावरून गेला. यात दोघांचाही जागीच मृत्यू झाला. या अपघात प्रकरणी ट्रक चालकाच्या विरोधात नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून ट्रकचालक फरार आहे.
हेही वाचा - ठाकरे हे माझेही मुख्यमंत्री... इम्तियाज जलील यांचा कंगनाच्या भाषाशैलीला विरोध!
हेही वाचा - 'ईटीव्ही भारत इम्पॅक्ट' : अखेर फेरीवाला पथक प्रमुख रविंद्र सानप निलंबित