ठाणे - भारत सरकारच्या वतीने 2020मध्ये केलेल्या सर्वेक्षणात ठाणे शहराने देशात चौदावा क्रमांक, तर राज्यात तिसरा क्रमांक पटकवला आहे. केंद्र शासनाच्या गृहनिर्माण आणि नगर विकास विभागाच्यावतीने दरवर्षी स्वच्छ सर्वेक्षण अभियान राबवण्यात येते. यामध्ये ठाणे शहराने आपला ठसा उमटवला आहे.
सन 2020 रोजी कचऱ्याचे संकलन आणि त्याची वाहतूक, प्रक्रिया, साफसफाई, जनजागृती, क्षमतावृध्दी आणि निकषांवर हे स्वच्छ सर्वेक्षण अभियान राबविण्यात आले होते. या सर्वेक्षणामध्ये यावर्षी ठाणे शहरात गतवर्षीच्या 57 व्या क्रमांकावरून देशात 14 व्या क्रमांकावर आघाडी घेतली आहे. तर राज्यात ठाणे शहराने 3 रा क्रमांक पटकवला आहे. या यशाबद्दल महापौर नरेश गणपत म्हस्के आणि महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी घनकचरा व्यवस्थापन टीमचे अभिनंदंन केले आहे.
कोविडच्या काळातही ठाणे महानगर पालिकेची स्वच्छता मोहीम ही मोठ्या प्रमाणात सुरू होती. मागील काही वर्षांत ठाण्यात स्वच्छतेकडे विशेष लक्ष देण्यात आले होते. त्यामुळे पालिका प्रशासनाला मिळालेले हे यश आहे.
दरम्यान, इंदोर शहराने सलग चौथ्यांदा देशातील सर्वात स्वच्छ शहराचा पुरस्कार पटकावला आहे. तर, गुजरात मधील सुरत हे दुसरे आणि राज्यातील नवी मुंबई हे भारतातील तिसऱ्या क्रमांकाचे सर्वात स्वच्छ शहर ठरले आहे.