ठाणे - टेम्पो आणि दुचाकी यांच्यात समोरासमोर झालेल्या धडकेत दुचाकीवरील दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना कल्याण-उल्हासनगर मार्गावरील वालधुनी पुलावर घडली.
याप्रकरणी महात्मा फुले पोलीस ठाण्यात टेम्पो चालकाविरोधात गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. तर योगेश पवार आणि अनिल भिसे, अशी अपघातात मृत्यू झालेल्या तरुणांची नावे आहेत. ते मुरबाड तालुक्यातील सरळगावचे रहिवासी आहेत.
मृत योगेश आणि अनिल हे दोघे मित्र शुक्रवारी रात्री साडेबाराच्या सुमारास दुचाकीवरून कल्याण-उल्हासनगर मार्गावरील वालधुनी ब्रिज वरून जात होते. त्याच सुमारास समोरून येणाऱ्या भरधाव टेम्पोने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. हा अपघात एवढा भीषण होता, की रस्त्यावर रक्ताचा सडा व मोटरसायकलचे तुकडे पसरले होते. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी झाले आणि त्यांनी गंभीर जखमी अवस्थेत दोन्ही मित्रांना कल्याणच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात हलवले. तेथे डॉक्टरांनी त्या दोघांनाही मृत्यू घोषित केले. या अपघातप्रकरणी टेम्पो चालकाला ताब्यात घेतले असून अधिक तपास महात्मा पोलीस करीत आहे.