नवी मुंबई - ऐरोली सेक्टर ३ येथील श्रीराम विद्यालयाल शाळेतील व्यवस्थापकांनी नववीतील विद्यार्थ्यांच्या पालकांना निकाल घेण्यासाठी शाळेत बोलवल्याने कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन झाले. शाळेने व्हॉट्सअॅपद्वारे पालकांना संदेश पाठविला होता, त्यामुळे पालक व विद्यार्थ्यांनी शाळेमध्ये गर्दी केली. कोरोना काळात कोणत्याही प्रकारची सभा, बैठक अथवा गर्दी न करण्याच्या शासनाच्या आदेशाला श्रीराम शाळेने पायदळी तुडविल्याचा आरोप पालकांनी केला आहे.
निकालासाठी बोलवून पालकांवर 'फी'साठी टाकला दबाव -
इयत्ता नववीतील विद्यार्थ्यांच्या पालकांना निकाल घेण्यासाठी श्रीराम शाळेतील व्यवस्थापकांनी व्हॉट्सअॅपद्वारे सूचना संदेश पाठविला होता. त्यानुसार वेगवेगळे वेळापत्रक पालकांना व्हॉट्सअॅपद्वारे पाठविले होते. त्यासुचनेमध्ये असे सुद्धा नमूद करण्यात आले होते की, निकाल घेण्याअगोदर विद्यार्थ्यांची पूर्ण फी भरावी. ही सूचना मिळताच शेकडो पालक शाळेत गोळा झाले. पालकांनी शाळेच्या व्यवस्थापनाला जाब विचारताच बैठक रद्द करून मुख्याध्यापकांसह शाळा व्यवस्थापकांनी बाहेर धूम ठोकली.
शाळेत शासनाच्या नियमांची पायमल्ली होत असल्याचा पालकांचा आरोप -
राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. अशा गंभीर परिस्थितीमध्ये पालकांना एकत्रित बोलाविण्याची कारण काय? जर राज्य सरकारने इयत्ता पहिली ते नववी व अकरावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेविना पास करण्याचा निर्णय घेतला असताना श्रीराम विद्यालयाचा फी भरण्यासाठी असा अट्टहास का? असे प्रश्न पालकांनी उपस्थित केले आहेत. पालकांवर दबाव टाकून, त्यांच्याकडून फी वसूल करण्यासाठी शासनाच्या नियमांची पायमल्ली होत आहे, असा आरोप पालकांनी केला. असे करणाऱ्या शाळा, महाविद्यालयांवर प्रशासनाने कडक कारवाई करावी, अशी मागणी पालकांनी केली आहे.
दरम्यान, श्रीराम विद्यालयाला या प्रकरणी अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अहवालामध्ये त्रुटी आढळल्यास कारवाई करण्यात येईल, असे नवी मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाचे उप आयुक्त योगेश कडुसकर यांनी सांगितले.